Dainik Maval News : राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी देण्यात आली असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता कोणत्याही वेळेस करता येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत नियम ४६ अंतर्गत निवेदन सादर करताना दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सध्या राज्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळूचे उत्खनन अधिकृतपणे करता येते. मात्र, या काळात साठवलेली वाळू रात्री वाहून नेता येत नसल्यामुळे वैध बांधकाम प्रकल्पांना वेळेवर वाळू उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काही शहरांमध्ये दिवसा वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने वाळूच्या वाहतुकीस मर्यादा आहेत. शिवाय, विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वाळूची मागणी झपाट्याने वाढत आहे.”
“राज्याबाहेरून येणाऱ्या वाळूस झिरो रॉयल्टी पासच्या माध्यमातून २४ तास वाहतुकीस परवानगी दिली जाते. मात्र, राज्यातील वाळूची वाहतूक सायंकाळी ६ नंतर बंद असल्यामुळे उपलब्ध वाळूचा पूर्ण वापर होऊ शकत नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
शासनाने वाहतुकीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. ‘महाखनीज’ पोर्टलवरून वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला ई-परवाना (eTP) आता २४ तास उपलब्ध आहे. सायंकाळी ६ नंतर वाहतूक करण्यास परवानगी देण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.
उत्खनन केलेल्या वाळूचे स्वतंत्र जिओ-फेन्सिंग करणे, वाहतूक स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस डिव्हाइस बसविणे या उपाययोजनांमुळे राज्यातील वाळू वाहतूक अधिक नियंत्रित, पारदर्शक आणि सुलभ होईल, असा विश्वास महसूलमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.
वाळू वाहतुकीसाठी काही अटींसह २४ तास परवानगी –
सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वाळू वाहतुकीवर असलेली बंदी हटवून, काही अटींसह २४ तास वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वाळूचे उत्खनन सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच करता येईल. मात्र, या वेळेत उत्खनन करून ठेवलेली वाळू वैध वाहतूक परवाना (eTP/CTP) घेतलेल्या वाहनांद्वारे २४ तास वाहतूक करता येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री बावनकुळे म्हणाले, वाढती वाळूची मागणी आणि वाहतुकीवरील निर्बंधामुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला आहे. अनेक शहरे व ठिकाणी वाहतूक गर्दीमुळे दिवसा वाळू वाहतुकीवर निर्बंध होते. तसेच, परराज्यातून येणाऱ्या वाळूस झिरो रॉयल्टी पासद्वारे २४ तास वाहतूक करता येते. मात्र, राज्यातील वाळू वाहतुकीस सायंकाळी ६ नंतर बंदी असल्यामुळे स्थानिक वाळूचा पुरेपूर उपयोग होऊ शकत नव्हता. आता वाळू वाहतुकीसाठी २४ तास eTP परवाना तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यासाठी उत्खनन करून ठेवलेल्या वाळूचे स्वतंत्र Geo-Fencing, वाळू/रेती गटांवर सीसीटिव्ही प्रणाली बसविणे,वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवणे इत्यादी अटी बंधनकारक असतील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News