Dainik Maval News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे :
1. आधार ऑनलाईन ई-केवायसी,
2. आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी,
3. आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी,
4. नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे.
अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. संदर्भाने, एमपीएससीने मार्च 2017 पासून ऑनलाईन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके