पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : त्याला वडील असूनही त्यांचा आधार मिळाला नाही.. आई लहानपणीच अजाणत्या वयात त्याला आणि भावाला घेऊन पोटापाण्यासाठी पुण्यात आली.. मोलमजुरीची कामं करु लागली.. त्यानं कशीबशी दहावी पूर्ण केली.. शिकायच्या आवडीनं त्याला कवितांची गोडी लागली.. तो कविता लिहू लागला.. व्यासपीठावर सादर करु लागला.. पुढं तो सुंदर लेखन करु लागला आणि लघुपटांच्या निर्मितीपर्यंत पोचला. सामाजिक विषयांवरील लघुपटांची निर्मिती त्यानं केलीये. आता त्याला चित्रपट बनवायचा आहे. ही गोष्ट आहे मराठातील उभरता दिग्दर्शक कवी ह्रदयमानव (वय 29) याची. अडथळ्यांच्या वाटेवरील ह्रदयमानवचा महत्वाकांक्षी प्रवास प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी जाणून घेतला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कोमजलेलं बालपण, आश्रमाचा आधार –
ह्रदयमानव सध्या वाघोलीमध्ये स्थायिक आहे. तो मूळचा अहमदनगरमधील जामखेडचा. वडील व्यसनाधीन असल्यानं आई-वडिलांचे सारखे वाद व्हायचे. त्यामुळं त्याची आई चिमुरड्या लेकरांना घेऊन उदरनिर्वाहासाठी थेट पुण्यात आली. तेव्हा ह्रदयमानव फक्त सात वर्षाचा होता आणि भाऊ धाकटा. या अनिश्चितत, कठीण काळात ह्रदयमानवची आई डांबरकामाच्या ठिकाणी काम करु लागली, रस्त्यावरचं जीणं वाट्याला आलं. लेकरांना व्यवस्थित मोठं करायचं हे एकच त्या आईचं ध्येय होतं. म्हणूनच तिनं वडगाव शेरीला भाडेतत्वावर घर मिळवलं आणि ह्रदयमानवला महापालिकेच्या शाळेत दुसरया इयत्तेत घातलं. त्याची शाळा व्यवस्थित सुरू झाली अणि आणि त्याची अभ्यासातील प्रगतीही उत्तम होती. पण, ह्रदयमानवला बसने शाळेत यावं-जावं लागत होतं तेव्हा आई त्याला त्या शाळेतून काढण्याचा विचार केला. तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी ह्रदयमानव हुशार असल्यानं त्याला शाळेतून काढू नका असं सांगून अनाथाश्रमाबद्दल सांगितलं आणि ह्रदयमानवला आश्रमात प्रवेशही मिळवून दिला. या अनाथाश्रमात राहून त्यानं आपलं दहावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. लहानपणी पोतराज बनून पैसे मागणाऱ्या या मुलाला आश्रमाचा चांगला आधार मिळाला.
कवितांची लागली गोडी –
ह्रदयमानवचं हस्ताक्षर सुंदर आहे. त्याला अभ्यासात रस होता. आश्रमामध्ये एकदा विद्यार्थ्यांना कविता लिहायला सांगितलं होतं, तेव्हापासून ह्रदयमानवला कविता लिहिण्याची आवड लागली. अनेक कविता त्यानं लिहून साठवून ठेवल्या होत्या. शाळेत असतानाच ‘उमलत्या कविता’ या विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहात ह्रदयमानवची कविता झळकली. याचवेळी दिवंगत सामाजिक नेते भाई वैद्य, इलाही जमादार, पन्नालाल सुराणा, म. भा. चव्हाण या दिग्गज प्रतिभावंतांची ओळख ह्रदयमानवला झाली आणि त्याच्या लेखनाला प्रोत्साहनच मिळालं. दिवसेंदिवस त्याचं लेखन वाढत राहिलं, परिस्थितीमुळं दहावीनंतर ह्रदयमानवचं शिक्षण थांबलं होतं. तरी कविता लिहिण्याची आवड मात्र कायम राहिली. कित्येक सुंदर कविता त्यानं लिहिल्या. तो लिहत राहिला आणि कवी म्हणून घडू लागला. ( marathi poet director ashok thokal aka hridaymanav Interview Pune Dainik Maval Samvad )
ग्रंथालयात मिळाली नोकरी आणि दिशा –
सुट्टीमध्ये आश्रमातून घरी आल्यावर ह्रदयमानव घरी छोटी कामं करायचा. ते राहात असलेल्या वस्तीतील मुलांसोबत तो लग्नसमारंभात पाणी वाटप करायचं काम करायचा. ते राहतं घर अतिशय लहान होतं, त्यामुळं ह्रदयमानव घरासमोरच्या इमारतीत असलेल्या ग्रंथालयात जास्त वावरायचा, तिथं झोपायलाही जायचा. याच दरम्यान ह्रदयमानवला आनंदयात्री ग्रंथालयात साफसफाईचं काम मिळालं, तेव्हा तो 17-18 वर्षाचा होता. अकरावीत प्रवेश घेतला होता परंतु शुल्क भरण्याची अडचण असल्यानं तो कॉलेजला गेलाच नाही. पण ग्रंथालयात काम करताना त्याला पुढची दिशा मिळाली. ती अशी की, ग्रंथालयात त्याचं वाचन वाढलं, लेखन वाढलं आणि त्याच्या कविता प्रगल्भ होऊ लागल्या.
ग्रंथालयाच्या बऱ्याच छोट्या-छोट्या कार्यक्रमांतून ह्रदयमानवला विविध व्यासपीठांची माहिती मिळत गेली, त्याचा जनसंपर्क वाढला व पुण्यात विविध कार्यक्रमांत तो कविता सादर करु लागला, कवी म्हणून नाव मिळवू लागला. अलीकडे राज्यभरात गावोगावी कविता सादर करुन त्यानं आपल्या आणि आपल्या कवितांची वेगळी ओळख निर्माण केलीये. दहावीनंतर तब्बल दहा-बारा वर्षाच्या अंतरानं त्यानं बारावी पूर्ण केलीय. आता तो पदवीच्या दुसऱ्या वर्षाचं (SYBA) शिक्षण घेत आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण करुन पुढंचही शिक्षण घेण्याचा ह्रदयमानवचा निश्चिय आहे.
जपली कला, निर्मिती क्षेत्रात पाऊल –
ग्रंथालयातील कामानंतर ह्रदयमानवनं ऑफीसबॉय, वेटर, वॉचमन अशी कामं केली. ही कामं करताना आपली कलेची आवडही जोपासली म्हणजे चित्रपट व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. त्यासाठी तो मुंबईला जात असे. तिथं त्याला चित्रपट निर्मितीचं ज्ञान मिळालं. लघुपट निर्मिती करुन त्यानं लेखन-दिग्दर्शन-निर्मिती क्षेत्रात भक्कम पाऊल टाकलं. गेल्या काही वर्षात ‘नो व्हेकन्सी’, ‘सुगंधा’, ‘सदाफुली’, ‘दिक्षा’, ‘हुंदका’, ‘व्हेअर इज भिडेवाडा’ या आशयसंपन्न लघुपटांची निर्मिती केली आहे.
मित्रपरिवाराला सोबत घेऊन हे लघुपट त्यानं बनवले आहेत. स्वतःही त्यात भूमिका साकारली आहे. व्हेअर इज भिडेवाडा या कलाकृतीला सन्मान प्राप्त झाले आहे. सुरवातीला सन 2013 मध्ये त्यानं ‘मुलगी या नात्याने दोन शब्द’ हा पहिला लघुपट तयार केला होता. यासह, सामाजिक विषयांवर बरीच गाणी ह्रदयमानवनं लिहिली आहेत. या मित्रपरिवाराच्या कलास्नेह प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून या विविध कलाकृती रसिकांसमोर येत असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ह्रदयमानव आणि त्याचा मित्रपरिवार पथनाट्याद्वारे विविध सामाजिक विषयांवर जागृती करत आहेत.
पुढची वाटचाल अशी –
सामाजिक चळवळी या विषयावरील कादंबरी आणि कवितासंग्रह ही ह्रदयमानवची पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘कलर ऑफ नॅशनलिझम’ आणि ‘आम्ही भारताचे लोक’ या दोन लघुपटांच्या निर्मितीचं कम सुरु आहे. आता ह्रदयमानवला चित्रपट बनवायचा असून त्यासाठीही त्याची तयारी सुरु आहे.
आईचा संघर्ष आणि स्वतःचं घर –
आईनं अपार कष्ट सोसून ह्रदयमानवला शिक्षण दिलं म्हणून त्याचं जीवन सुंदर घडलं. त्याच्या आईचे कष्ट जाणून घेण्यासारखे आहेत. मुलांचं संगोपन करण्यासाठी ह्रदयमानवची आई प्रचंड मेहनत करायची. सुरुवातीला तिनं डांबरकामात काम केलं. नंतर ती धुण्याभांड्याची कामं करुन दवाखान्यात काम करायची. ह्रदयमानव होता त्या आश्रमात तिनं गवत काढण्याचं, स्वच्छतेचं काम केलं. नंतर तिनं कचरा गाडीवर कचरावेचकाचं काम केलं. असं अखंडपणे श्रम करुन आईनं मुलांना मोठं केलं आणि लोणीकंदला स्वतःचं घरही बांधलयं. आता दोन्ही मुलं मार्गी लागल्यावरच ती निवांत झालीये.
पुरस्कार आणि ओळख –
ह्रदयमानवनं लेखन-कलाक्षेत्रात शून्यातून स्वतःचं स्थान निर्माण केलं. दर्जेदार कलाकृती तो निर्माण करतोय. त्याकरता अखंड मेहनत घेतोय. या कार्यासाठी त्याला अनेक सन्मान मिळाले आहेत. महत्वाचं म्हणजे ह्रदयमानवचं खरं नाव अशोक ठोकळ असून आणि ह्रदयमानव हे नाव त्याला दिवंगत गझलकार इलाही जमादार यांनी एका कार्यक्रमात प्रेमानं दिलं आहे. आपल्या सुंदर कलाकृतीतून आपल्या ह्रदयमानव या नावाचं स्थान हे मनामनांत पक्क केलं आहे.
“आईनं मला घडवलं. वडिलांचं प्रेम, आधार, सहवास मला मिळाला नाही. आईनं मला शिक्षण दिलं. शिक्षण नसतं तर कदाचित हालाखीचं जीणं वाट्याला आलं असतं. लेखन-कला क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्यासाठी खूप संघर्ष केला. या क्षेत्रात आल्यानं माझं जीवन आनंदी झालंय.” – ह्रदयमानव
अधिक वाचा –
– सतत काम सांगतो म्हणून कामगाराने केला मॅनेजरचा खून, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना । Maval Taluka Crime News
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade
– ‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी नाहीतर…’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका