Dainik Maval News : लाखो रुपयांच्या डामडौलामध्ये संपन्न होणाऱ्या लग्न सोहळ्याची उंची वाढविणारा निवेदक उपेक्षितच राहतो. अशा निवेदकांना मान-सन्मान मिळावा यासाठी मावळ तालुका निवेदक संघाने पुढाकार घेऊन मावळ तालुक्यातील निवेदकांना योग्य मानधन व सन्मान द्यावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
वडगाव मावळ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस संघाचे संस्थापक रामदास वाडेकर, संस्थापक गणेश विनोदे, अध्यक्ष अतुल सातकर, कार्याध्यक्ष रमेश जाचक, तानाजी पडवळ, संजय गाडे, शांताराम ढाकोळ, चंद्रकांत घारे, संतोष राक्षे, भानुदास जांभुळकर, जालिंदर शेटे, अनंता आंद्रे, शरद सावंत, प्रवीण मुऱ्हे, प्रवीण ढोरे, अनंता कुडे, अमोल केदारी, वैभव पिंपळे, संदीप तिकोने, दिलीप गावडे, संदीप शिंदे, राजेश मोहिते, नागेश मरगळे, योगेश पिंगळे, योगेश माझीरे, रामदास चांदगुडे, रंगनाथ चव्हाण, सतीश गराडे, अमोल केदारी, अंकुश लोहोट, संजय बनसोडे, मंगेश शेलार, तुषार जगताप, विकास लालगुडे उपस्थित होते.
यावेळी निवेदकांनी त्यांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांबाबत सांगितले की, तालुक्यातील गावोगावी निवेदक म्हणून तरुण किंवा ज्येष्ठ मंडळी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ प्रेमापोटी विविध कार्यक्रमांमध्ये निवेदन करण्याचे काम करतात. निवेदन करताना प्रत्येकाचे नाव, पद घेऊन ते स्वागत व त्या लग्न सोहळ्याचे नियोजन करत असतात. परंतु, जवळपास दोन-दोन तास घसा कोरडा करणाऱ्या या निवेदकाचा सन्मान तर सोडाच, कोणी साधे नावही घेत नाही. याउलट एखाद्याचे नाव घ्यायचे राहिले की संबंधित व्यक्ती लगेच निवेदकावर रोष व्यक्त करतो. इतकेच नाही, यावरून अनेकदा वादावादीलाही सामोरे जावे लागते. परंतु त्याच व्यक्तीचे नाव यापूर्वी अनेकदा घेतलेले असते, तेव्हा मात्र कधी कौतुकाची थाप टाकली जात नाही.
विशेष म्हणजे इतर तालुक्यातून निमंत्रित केलेल्या निवेदकांना पाच ते वीस हजारांपर्यंत बिदागी देऊन बोलावले जाते. त्याच्याकडून मात्र नाव घ्यायचे राहिले तर कोणीही काहीही बोलत नाही. स्थानिक निवेदक मात्र विना मोबदला सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असताना त्यांना अशा वादाला सामोरे जावे लागते. त्यात, अलिकडच्या काळात वाढलेली महागाई, आर्थिक गरज लक्षात घेता निवेदकांनाही त्यांच्या कष्टाचे फळ मिळणे अपेक्षित झाले आहे. लग्न समारंभावर लाखो रुपये खर्च होतात. सोशल मिडियावरील डिझाईन किंवा रिल्सपासून प्रत्येक गोष्टीला पैसे द्यावे लागतात. मग त्या लग्न सोहळ्याची उंची वाढविणारा निवेदक वंचित का? याशिवाय बाहेरून येणाऱ्या निवेदकाला २० हजारांपर्यंत मानधन दिले जाते, मग स्थानिक निवेदक वंचित का, असा सवाल निवेदकांनी व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकी कायम
यापुढे लग्न समारंभात निवेदन करणाऱ्या निवेदकांना योग्य मानधन व योग्य सन्मान द्यावा, अशी मागणी यावेळी निवेदक संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच दुःखाचे प्रसंग किंवा सामुदायिक विवाह सोहळा, तसेच गरीब कुटुंबातील लग्न समारंभ अशा ठिकाणी कुठलेही मानधन घेणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती