Dainik Maval News : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत.
गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक २० तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे पण एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले.
‘पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द
वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने कळविले आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो