Dainik Maval News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रचार आता ऐन शिगेला पोहोचला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १५ व्या सार्वत्रिक निवडणुकीत २२७ नगरसेवक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत यंदा केवळ रॅली किंवा सभांचेच मैदान गाजत नसून ‘डिजिटल प्रचार’ देखील गाजत आहे. या प्रचारात भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधकांना चांगलेच मागे टाकलेले दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘मार्व्हल’ सिनेमॅटिक युनिव्हर्सचा कल्पक वापर आणि आक्रमक नरेटिव्हच्या जोरावर भाजपाने मुंबईतील तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे.
‘मार्व्हल’ अवतारातील भाजपाच्या प्रचाराची तरुणाईमध्ये ‘क्रेझ’
मुंबई महापालिका निवडणुकीचे यावेळचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे भाजपाचे ‘एआय’ जनरेटेड व्हिडिओ कॅम्पेन. टोनी स्टार्क (आयर्न मॅन), थानोस, स्पायडरमॅन आणि हल्क यांसारख्या जगप्रसिद्ध सुपरहिरो पात्रांना चक्क मुंबईच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपाने प्रचाराची व्याख्याच बदलून टाकली आहे. हे सुपरहिरोज मुंबईच्या विकासावर आणि समस्यांवर भाष्य करताना दिसत असल्याने सोशल मीडियावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील मतदारांमध्ये या कल्पकतेमुळे भाजपाबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली आहे. काँग्रेससारख्या पक्षांनीही या ट्रेंडचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अचूकता आणि संदेशाची स्पष्टता यामुळे भाजपा ह्या शर्यतीत ‘एंडगेम’च्या फायनल टचपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.
भाजपाने केवळ मनोरंजनावर भर न देता “त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही” या घोषणेद्वारे मतदारांना एक खंबीर पर्याय दिला आहे. ही घोषणा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता, ती प्रत्येक बॅनर, पोस्टर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकसमान पद्धतीने मांडली जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या जुन्या रेडिओ जाहिरातींचा संदर्भ घेत भाजपाने त्यांचाच संदेश त्यांच्यावर उलटवण्याची जी रणनीती आखली आहे, त्यामुळे विरोधक बॅकफूटवर गेले आहेत.
केवळ होर्डिंगबाजी करून आणि जुन्या कामांवर शिक्का मारून मुंबईचा विकास झाला, असा भास निर्माण करणे आता कठीण झाले आहे, कारण भाजपाने आपल्या डिजिटल कॅम्पेनमधून ‘रिअल-टाइम’ प्रगती आणि भविष्यातील व्हिजन मतदारांसमोर मांडले आहे.
- आजच्या युगात ज्याच्याकडे लोकांचे लक्ष, त्याचेच राजकारण यशस्वी ठरते. भाजपने हे सूत्र ओळखून लांबलचक भाषणांपेक्षा ‘शेअरेबल’ आणि ‘रिकॉल व्हॅल्यू’ असलेले कंटेंट तयार करण्यावर भर दिला आहे. इन्स्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटस आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून भाजपचे मेसेज प्रत्येक मुंबईकराच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे विरोधकांचा पारंपारिक प्रचार भाजपच्या या डिजिटल झंझावातासमोर फिका पडत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मुंबई महानगरपालिकेची ही लढाई आता केवळ रस्ते आणि नालेसफाईपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई आहे ‘नरेटिव्ह’ची. आधुनिक तंत्रज्ञान, तरुण पिढीची भाषा आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप घेऊन भाजपा निवडणुकीत उतरली आहे. ‘मार्व्हल’च्या सुपरहिरोजप्रमाणेच भाजपाने मुंबईच्या राजकीय पटलावर आपली पकड घट्ट केली असून, विरोधकांच्या भूलथापांना मुंबईकर बळी पडणार नाहीत, असा विश्वास भाजपा व्यक्त करीत आहे.
अधिक वाचा –
– मुंबईच्या विकासाचा वारू कोण रोखू पाहतंय ? देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि ‘स्वप्ननगरी’ विकासाच्या रुळावर
– मराठी अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर ? ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्तेची २५ वर्षे आणि मराठीचा टक्का
