5 Reasons Of Sanjog Waghere Defeat : लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीरंग बारणे यांनी महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा तब्बल 96 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. असे असले तरीही संजोग वाघेरे यांनी खासदारकीच्या उमेदवारीच्या पहिल्याच प्रयत्नात अनुभवी बारणेंना चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे निकालानंतरही मावळ लोकसभेची चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजोग वाघेरे यांचा पराभव हा जवळपास लाखभर मतांनी झाल्याने श्रीरंग बारणेंचा विजय नक्कीच मोठा आहे. परंतू अटीतटीच्या या लढतीत संजोग वाघेरे का हरले, त्यांच्या पराभवामागील कारणे काय आहेत, महाविकासआघाडीचे गणित नेमके कुठे चुकले ? या सर्वांचीच चर्चा आता होऊ लागली आहे. दैनिक मावळच्या माध्यमातून आम्ही आम्हाला नजरेस आलेली संजोग वाघेरे यांची 5 कारणे येथे नमूद करत आहोत. ( Maval Lok Sabha 2024 Result Shrirang Barne Won Read 5 Reasons Of Sanjog Waghere Defeat )
संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे ;
कारण क्रमांक 1 – नवखा उमेदवार आणि नवीन चिन्ह
संजोग वाघेरे हे मावळ लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्थात महाविकासआघाडीच्या बाजूने अधिकृत उमेदवार होते. संजोग वाघेरे पाटील ह्यांची चर्चा त्यांनी राष्ट्रवादी सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे होऊ लागली होती. त्यानंतर त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. परंतू तत्पपूर्वी संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाला ते परिचीत नव्हते. नात्यागोत्यांमुळे मावळ विधानसभा क्षेत्रातील काहीभाग वगळला तर संपूर्ण मावळ लोकसभेसाठी त्यांचा चेहरा नवीन होता. सोबतच शिवसेना फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले. 2009 पासून मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाच्या ताब्यात आहे, मात्र धनुष्यबाण चिन्हावर खासदार निवडून आले होते. अशात मशाल हे चिन्ह मतदारांसाठी अगदीच नवीन होते. वाघेरेंचे नवेपण आणि चिन्ह हे वाघेरेंच्या पराभवातील पहिले प्रमुख कारण आहे.
कारण क्रमांक 2 – पक्षफुटीनंतरची सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यात अपयश
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडली. यात मविआचे सरकार गेले. पाठोपाठ या दोन्ही पक्षांची चिन्हे आणि नाव देखील पक्ष फोडून बाहेर गेलेल्यांसोबत राहिले. त्यामुळे आपसुकच जनतेची सहानुभूती ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत होती. ही सहानुभूती प्रचंड मोठी होती, जी आता निकालात दिसून आली आहे. मावळ लोकसभेत देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मोठा जनसंपर्क आहे. किंबहुना सहाही विधानसभेत त्यांचा जनाधार आहे. अशात दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर निर्माण झालेली सहानुभूती मतांच्या रुपाने स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्यात वाघेरे कमी पडल्याचे दिसत आहे. हेही त्यांच्या पराभवाचे एक कारण ठरले आहे.
कारण क्रमांक 3 – बारणेंबद्दलच्या नाराजीचा फायदा उचलण्यात कसूर
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला होता. अनेक दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात होते. तसेच त्यांच्याबद्दल नाराजीची एख सुप्त लाट देखील संपूर्ण मतदारसंघात होती. ह्या नाराजीचा फायदा उचलण्यात संजोग वाघेरे कमी पडले. इथे त्यांचा अनुभव थोडा कमी पडल्याचे दिसून आले. बारणेंनी नाराजी असून देखील नेते, पदाधिकाऱ्यांना पुन्हा हाताशी धरून राजकारण साधले. परंतू दुसरीकडे श्रीरंग बारणेंविरोधातील नाराजी मतांच्यारुपात कॅच करण्यात वाघेरेंना अपयश आल्याचे दिसून आले.
कारण क्रमांक 4 – दिग्गज नेत्यांच्या सोबतीचा अभाव आणि मविआची तोकडी मदत
यंदाची निवडणूक ही खऱ्या अर्थांने नेत्यांच्या ताकदीची निवडणूक होती. कारण पक्षांच्या फाटाफुटीनंतर सर्व मदार ही नेते, त्यांचा जनाधार, त्यांना माननारा वर्ग यांवर अवलंबून होती. संपूर्ण लोकसभा निवडणूकीत काही मोजके नेते वगळता संजोग वाघेरे यांना दिग्गज म्हणावेत अशा नेत्यांची खुप कमी साथ लाभली. अपेक्षित असूनही काही नेत्यांच्या सभा संपूर्ण मतदारसंघात झाल्या नाही. शिवसेना पक्षाचे वरिष्ठ वगळता मविआतील अन्य पक्षातील दिग्गज नेत्यांची साथ कमी लागली. मतदारांवर प्रभाव पाडण्यात या गोष्टी आवश्यक असतात, पण त्या न झाल्याचा फटका वाघेरेंना नक्कीच बसला. सोबतच सहाही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आप्पा बारणे यांच्यासोबत होते. त्यामुळे मविआची खुप कमी ताकद वाघेरेंच्या मागे उभी राहिलेली दिसून आली.
कारण क्रमांक 5 – महानगरांमधील राजकारण साधण्यात अपयश
संजोग वाघेरे हे स्वतः पिंपरी शहरातील रहिवासी आहेत. निकालानंतर त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पिछाडीवर राहावे लागल्याचे दिसून आले. तर चिंचवड आणि पनवेल या शहरांतही ते पिछाडीवरच राहिले. मावळ लोकसभेचा निकाल ठरवणारी पिंपरी-चिंचवड आणि पनवेल ही दोन महानगरे आहेत. परंतू या दोन्ही शहरात अर्थात एकूण तीन विधानसभेत वाघेरे पिछाडीवर राहिले, आणि तिथेच पराभूत झाले. यातील एकाही ठिकाणचे राजकारण आपल्या फेवरमध्ये करण्यात वाघेरेंना यश आले नाही, ही त्यांची पडती बाजू झाली. येथील पक्ष, संघटना, संस्था यांच्याशी वाघेरेंचा संपर्क नक्कीच झाला. परंतू मतदानापर्यंत त्यांना बांधून ठेवण्यात वाघेरेंना अपयश आले. याउलट बारणेंनी सर्वांची नाराजी दूर करूनही येथे आघाडी घेतली. हेही ,संजोग वाघेरे यांच्या पराभवाचे एक महत्वाचे कारण राहिले.
अधिक वाचा –
– पवना शिक्षण संकुलात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमाची सुरूवात; संस्थेमार्फत 9000 झाडांची होणार लागवड । Pavananagar
– थराराक ! मावळ तालुक्यात दोन गटात हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी । Maval Crime
– मावळात श्रीरंग बारणेंना मिळालेल्या आघाडीपेक्षा न मिळालेल्या मताधिक्याची चर्चा ! भाजपा की राष्ट्रवादी, नक्की कुणामुळे मतं घटली?