पुणे, (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : लहानपणापासून वडीलांना शेतीच्या कामात मदत करताना माती, झाडं आणि निसर्गाशीच काकांची घट्ट मैत्री झाली. धरित्रीची अगदी आई-वडिलांसारखीच सेवा करण्याचे संस्कार मनात रुजले अन् निसर्गसेवा काकांच्या हातून मनोभावे होत गेली. ‘वृक्ष लागवड आणि संवर्धन’ हेच काकांचं जीवनव्रत आहे. गेली ३८ वर्षे काकांनी त्याचं व्रत जोपासलं आहे. वसुंधरेला समृद्ध करणारे हे काका म्हणजे पुण्यातील रघुनाथ ढोले (वय ६८).
(World Environment Day) रघुनाथकाका पुण्यातील घोरपडीला लहानपणापासूनच स्थायिक आहेत. त्याचं शालेय शिक्षण त्या परिसरातच झालं. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी एम. एससी. (फिजिकल केमिस्ट्री) पदवी पूर्ण केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रघुनाथकाकांचे वडील घोरपडीतील लष्कराच्या जमिनीवर शेती करायचे. अभ्यास करुन काका वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचे. त्यामुळं लहान वयातच झाडांबद्दल प्रेम निर्माण झालं, झाडांचं महत्व समजल होतं. महाविद्यालयीन शिक्षणानंतर काकांना पुण्यात forensic Science Laboratory मध्ये नोकरी लागली. गॅझेटेड ऑफिसर पदावर काका २० वर्ष कार्यरत राहिले. आपल्या अतिशय आवडीचं वृक्षसंवर्धनाचं काम करण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि निसर्गसेवेला वाहून घेतलं. त्यासाठी विविध प्रशिक्षणं घेतली. गार्डन डेव्हलपमेन्टचा व्यवसाय सुरु केला. काकांच्या कुटुंबियांनी निसर्गसेवेत त्यांच्या बरोबरीनं सहभाग घेतला आहे.
थेऊरला चार एकर जमीन घेऊन तिथं काकांनी ‘देवराई’ ही सुंदर नर्सरी साकारली आहे. या देवराईमध्ये काकांनी विविध झाडांच्या बीयांचं संकलन केलं आहे, आजवर देशी झाडांची लाखो रोपं तयार करुन त्याचं राज्यभरात वाटप केलं आहे. संतुलित पर्यावरणासाठी वृक्षसंवर्धन अतिशय महत्वाचं असल्यानं ‘मागेल त्याला रोप’ ही त्यांची कार्यपद्धती आहे.
वृक्षलागवड आणि संवर्धनाचं काम अखंड सुरू राहावं या उद्देशानं काकांनी ११ वर्षापूर्वी देवराई फाऊंडेशनची स्थापना केली. फाऊंडेशनने आजवर सुमारे ३० लाख रोपांची लागवड आणि वाटप केले आहे. पर्यावरणात हिरवाई फुलवण्यासाठी हजारो लोक फाऊंडेशनशी जोडले गेले आहेत. झाड लावणारया प्रत्येक व्यक्तीला काका देवराई फाऊंडेशनचं सदस्य मानतात. फाऊंडेशनच्या कामानिमित्त २०-२५ कामगारांना थेऊरच्या नर्सरीत रोजगारही मिळाला आहे.
- देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं जंगल जे हजारो वर्ष कोणीही तोडत नाही; अशी देवराईची व्याख्या काकांनी सांगितली. देवराई फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि गुजरात, भोपाळ, बेंगलोर, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात अडीचशेहून अधिक देवराई विकसित करण्यात आल्या आहेत. फाऊंडेशनकडून वेळोवेळी भेट देऊन तसंच स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊन देवराईच्या संगोपनाची माहिती घेतली जाते. या सर्व देवराईंचे संगोपनही चांगल्या प्रकारे होत आहे.
वृक्षारोपणाविषयीचं सर्व मार्गदर्शन व मदत आपल्याला देवराई फाऊंडेशनकडून मिळते. अनेक संस्था, शाळांनी फाऊंडेशनच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. ( World Environment Day Special Interview with Devrai Foundation Raghunath Dhole Pune )
वृक्षसंवर्धनाच्या या अनमोल कार्यासाठी राज्यशासनाने वनश्री पुरस्काराने काकांना गौरविलं आहे. इतरही अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आहे. गेली ३८ वर्षे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा विचार रघुनाथकाका कृतीतून जगत आहेत.
‘ज्या झाडांवर प्राणी, पक्षी, मधमाशा, किडे, मुंग्या जगतात अशी सर्व झाडं लावली पाहिजेत. घरातील कुंडीतही फुलझाडं, गवतीचहा, कढीपत्ता ही झाडं लावावीत. ग्रामीण भाग असो किंवा शहरी झाडं लावायला भरपूर जागा आहे. आपण जागा शोधली की सापडते. नागरिकांमध्ये झाडं लावणयाचं प्रमाण आता वाढत आहे. ही जनजागृती हेच आमच्या वृक्षसंवर्धनाच्या चळवळीचं यश आहे.’ – रघुनाथकाका
अधिक वाचा –
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result