मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे हे आपल्या वेगवेगळ्या 9 मागण्या घेऊन पुन्हा उपोषणाला बसले असून त्यांच्या 9 मागण्यांपैकी एक मागणी आता राज्य सरकारकडून तातडीने मान्य करण्यात आली आहे. सरकारने या निर्णयात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
काय निर्णय घेतलाय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.