Dainik Maval News : एकीकडे देशभरात ८०व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असताना, दुसरीकडे मात्र मुंबई-पुणे सारख्या महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्यातील धनगरवाडे, आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधा पोहोल्या नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मावळातील कुसवली पठारावरील एका वृद्ध रुग्णाला उपचारासाठी ग्रामस्थांनी चक्क झोळीतून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असलेल्या मावळ तालुक्याच्या विकासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
- मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्याला विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यात रिंग रोड, एमआयडीसी, स्कायवॉक यांसह विविध मोठ्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. अनेक भागांत रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र, याच मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी झोळीचा आधार घ्यावा लागत असेल, तर या विकासाचा लाभ नेमका कोणापर्यंत पोहोचला? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
कुसवली पठार आणि परिसरातील दुर्गम वाड्यांमध्ये पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्यांची अवस्था खराब असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्भवती महिला, शालेय विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती किंवा एखादा रुग्ण आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र येऊन झोळी अथवा खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही थेट वाडीपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत आहे.
कुसवली पठारावरील धनगरवाड्यांसह परिसरातील काही वाड्यांमध्ये अद्यापही रस्त्याची सुविधा अत्यंत अपुरी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास वाहन गावापर्यंत पोहोचणेही कठीण होते. अशा वेळी रुग्णाला झोळीतून किंवा खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मावळ तालुक्यात अनेक निवडणुका झाल्या, विविध सरकारे सत्तेवर आली आणि लोकप्रतिनिधी निवडून आले. तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली. मात्र दुर्गम वाड्यांमधील नागरिकांच्या मूलभूत रस्त्याच्या प्रश्नाकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. एका बाजूला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णाला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ – मावळच्या विकासाचे हे विरोधाभासी चित्र नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारे आहे.
दुर्गम भागातील नागरिकांनाही शहरातील नागरिकांप्रमाणेच रस्ता, आरोग्य, वाहतूक, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ मोठ्या प्रकल्पांवर भर न देता कुसवली पठार, धनगरवाडी आणि परिसरातील दुर्गम वाड्यांना बारमाही रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद


