पुणे, (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : या चिमुरडीचे आई-बाबा दोघेही शाळेत शिक्षक होते…ही चिमुरडी लहानपणापासून अभ्यासात हुशार होती…तिला छान-छान ऐकायला वाचायला फार आवडायचं; ते तिच्या लक्षातही राहायचं…शाळेत असतानाच ती गोष्टी-कविता लिहू लागली…उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण झाली…खेळात प्राविण्य मिळवलं…विज्ञान शाखेतून बारावी पास झाली…डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी पुण्यात आली…खूप अभ्यास करुन डॉक्टर बनली आणि कोवळ्या वयात मनावर झालेल्या वाचन व लेखन संस्कारांनी ती लेखिकाही बनली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीतून पुढं पुढं जात या चिमुरड्या मुलीनं मोठेपणी वैद्यकीय आणि लेखन क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला, नावलौकिक मिळवला. ही गोष्ट आहे प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आणि बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे (वय ५५) यांची. खास उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त संगीताताईंशी संवाद साधलाय प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी. संगीताताईंना जाणून घेताना लहानांबरोबर मोठ्यांनाही वाचनाची गोडी लागणार आहे. ( Children and summer vacations Exclusive interview with Writer Dr Sangeeta Barve Dainik Maval Sanvad )
बालमनावर झाले संस्कार –
संगीताताई मूळच्या अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या. त्याचं आठवीपर्यंतच शिक्षण तिकडचं झालं. ताईंचे आई-बाबा दोघेही शिक्षक होते. आई मराठी विषय आणि बाबा चित्रकला शिकवायचे. छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे कुटुंब राहायचं. चिमुरड्या संगीताला एका मावशींकडे सांभाळायला ठेवून आई कामावर जायची; त्यांनाही गोड संगीताचा लळा लागला. त्या मावशी भर सकाळीही मंदिरात काकड आरतीला जाताना संगीताला सोबत न्यायच्या तेव्हा मंदिरातील ते मंगल शब्दस्वर संगीताताईंच्या कानी पडायचे. ताईंचे आजीआजोबा पूजा करताना श्लोक, गीतं गुणगुणायचे तेही ताईंना आवडायचं. संगीताताईंच्या आजीला ज्ञानेश्वरी जाणून घ्यायची फारफार इच्छा होती पण तिला वाचता येत नव्हतं. ही गोष्ट आजीनं संगीताताईंना सांगितली. तेव्हा छोट्या संगीतानं, “आजी, मी तुला ज्ञानेश्वरी वाचून दाखविन. तू नको काळजी करु.” असं उत्साहानं म्हटलं आणि इयत्ता चौथीत असतानाच संगीताताईंनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरवात केली, तेही स्पष्ट शब्दोच्चारात. एवढी लहान मुलगी किती सुंदर वाचन करतेय याचं आजीला नि तिच्या मैत्रिणींना मोठं कौतुक वाटायचं. सगळ्या आजीना नित्य ज्ञानेश्वरी वाचून दाखवणं संगीताताईंचा जणू छंदच होऊन गेलं.
- ज्ञानेश्वरीचं वाचन ताईंनाच्याही मनात एवढं बसलं होतं की पाठ्यपुस्तकातील ‘चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू’ हा धडा त्यांना फार आवडला आणि संतांविषयीच्या काही ओळी त्यांनी वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी स्वतः रचल्या, बोरुच्या लेखणीनं त्या ओळी कागदावर लिहिल्या. संगीताताईंच्या या कौशल्याचं शाळेतल्या बाईंना आश्चर्य आणि कौतुक वाटलं होतं. अशा प्रकारे लहानपणीच ताईंच्या मनावर चागलं ऐकण्याचे, वाचनाचे, लेखनाचे संस्कार झाले.
स्वतः लिहायच्या गोष्टी –
बाबा चित्रकला शिक्षक असल्यानं ते संगीताताईंना नेहमीच कोरे कागद आणून द्यायचे. त्यामुळं ताईंचा हट्टही पेन, कागद, पुस्तकं यासाठीच असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत संगीताताई कल्पना करुन स्वतःच्या मनानं गोष्टी लिहायच्या आणि ताईंचे बाबा त्या गोष्टींना शीर्षक देऊन सुंदर मुखपृष्ठ बनवून द्यायचे, खाली ताईंचं नाव लिहायचे आणि ताई ती पानं शिवून स्वतःचं गोष्टीचं पुस्तक बनवायच्या. फार मनोरंजक आणि शिकण्यासारखं होतं हे.
मुलीसाठी वडिलांनी रंगवलं घर –
मध्येच ताईंच्या वडिलांची नोकरी गेल्यानं ते बेरोजगार होते. आईवरच घर अवलंबून होतं. या कठीण काळातही आई-वडिलांनी आपल्या मुलींना आनंदात ठेवलं होतं. पुढं, वडिलांना बारामतीला नोकरी मिळाली ते तिकडे गेले आणि कालांतरानं त्यांनी संगीताताईंनाही शिक्षणासाठी आपल्यासोबत बारामतीला नेलं. तिथं त्यांनी अतिशय छोटी खोली भाडेतत्वावर घेतली होती आणि आपली लाडकी मुलगी आल्यावर तिच्या बालमनाला छान, प्रसन्न वाटावं म्हणून वडिलांनी भिंतीवर समुद्र आणि पोहणारे मासे स्वतः विविध रंगांत चितारले होते. ताई तेव्हा नववीला होत्या. या रंगीत खोलीत भरपूर अभ्यास करुन संगीताताई उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण झाल्या, शाळेत पहिल्या आल्या. खेळाही त्यांनी प्राविण्य मिळवलं होतं सोबतच आपली लिहिण्याची आवडही त्या जपत राहिल्या. अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेतला, बारामतीतच बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वप्न पाहिलं डॉक्टर बनायचं.
ताई बनल्या डॉक्टर संगीता –
‘एम. बी. बी. एस.’ला प्रवेश न मिळाल्यानं ताईंनी सन १९८२ मध्ये एकटीनं पुण्यात येऊन आयुर्वेद महाविद्यालयात बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कसबा पेठेत ताईंची आत्या होती त्यामुळं काही काळ त्या आत्याकडं राहिल्या. आत्याचं घर एवढं लहान होतं की ताई पलंगाखाली झोपायच्या आणि कॉलेजला गेल्यावरच अभ्यास करायच्या. नंतर त्या वसतीगृहात राहिल्या आणि मैत्रिणींसोबत रमून गेल्या. डॉक्टरकीचं शिक्षण घेताना ताईंचं अवांतर वाचन, लेखन सुरु होतं.
अभ्यास सांभाळून त्या ग्रंथालयातून मिळवून इतर पुस्तकं वाचायच्या, रद्दीच्या दुकानातून दोन-तीन रुपयांना पुस्तकं विकत घ्यायच्या. स्वतः कविता-गोष्टी लिहून सर्वांना वाचून दाखवायच्या, स्पर्धेला पाठवयाच्या. लेखनासाठी ताईंनी बरीच बक्षीसही मिळवली. महाविद्यालय-वसतिगृहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आणि आई-बाबांना लांब सोडून एकटीनं समोर येईल त्या परिस्थितीतीला सामोरं जात ताईंनी खूप अभ्यास करुन आपलं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण केलं. संगीताताई डॉक्टर झाल्या.
अर्थार्जनची नि संसाराची सुरवात –
बीएएमएस झाल्यावर ताईंची इंटर्नशीप (कार्यानुभव) सुरु झाली व त्यांना महिना साडेसातशे रुपये मिळू लागले, ही फार मोठी गोष्ट त्यांनी मेहनतीनं मिळवली. आईबाबांना लेकीचा फार अभिमान वाटला. यावेळी ताईंनी गॅरेजमध्ये राहून दिवस काढले. इंटर्नशीप करतानाच त्या रात्रीचं दवाखान्यात काम करु लागल्या, तिथं त्या बाकड्यावर झोपायच्या तेही थोडावेळच, पुन्हा सकाळी इंटर्नशीपला जायच्या. याच दरम्यान संगीताताईंचा विवाह शास्त्रीय गायक राजीव बर्वे यांच्याशी झाला व पुण्यातच त्यांच्या संसाराची सुरवात झाली.
प्रदीर्घ वैद्यकीय सेवा –
विवाहानंतर ताईंनी पुण्यात झोपडपट्टी परिसरात आपला दवाखाना सुरु केला. तिथं येणारया रुग्णांची परिस्थिती हालाखीची असायची, पाच-दहा रुपयेच मिळायचे. त्यामुळं त्यांच्याकडून पैशांची अपेक्षा न ठेवता ताई तब्बल २२ वर्ष त्यांना सेवा देत राहिल्या. अशा समाजसेवेसाठी वडिलांनी आणि त्यांच्या पतीनेही त्यांना नेहमी प्रोत्साहन दिलं. “आपल्याला राहायला घर आहे, माझी नोकरी आहे, व्यवस्थित खाणं आहे. मग तुझी ही सेवा सरु राहू दे” असं पती म्हणायचे आणि वडिलही “तू नाव, माणुसकी कमव’ असं ताईंना सांगायचे. नंतर ताईंनी एका रुग्णालयात इनचार्ज पदावरही काम केलं.
पहिलं पुस्तकं आणि आजवरच लेखनकार्य –
लग्नानंतर घर, दोन्ही मुलींची शाळा, घर हे सगळं सांभाळत ताईंनी मराठी विषयातून एम. ए. केले; विशेष योग्यता श्रेणीही मिळवली. पुढं ४२ व्या वर्षी आहारशास्त्रातील पदवी मिळवली. या सोबतच ताईंचं लेखन सुरुच होतं. सन १९९७ मध्ये ताईंचं पहिलं पुस्तकं म्हणजे ‘मृगतृष्णा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. सन २००१ मध्ये लहान मुलांसाठीचं ‘गंमत झाली भारी’ हे पुस्तक प्रकाशित झालं.
- सन २०१५ पासून ताईंनी वैद्यकीय काम थांबवलं आणि पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतलं. असंख्य कविता आणि लहान मुलांसाठी लेखन करुन ताईंनी कवयित्री आणि बालसाहित्यकार हा नावलौकिक मिळवलाय. आजवर ताईंचे ‘पियूची वही’, ‘रानफुले’, ‘झाडआजोबा’, ‘खारुताई आणि सावलीबाई’, ‘आदितीची साहसी सफर’, ‘उजेडाचा गाव’, ‘हुर्रे हुप’, ‘मिनूचे मनोगत’, ‘कचरयाचा राक्षस आणि ग्रीनी ग्रिजी’, ‘पियूची वही – भाग दोन – माझे आजोळ’, ‘बच्चों की फुलवारी’, ‘नलदमयंति आणि इतर कथा’, ‘भोपळयाची बी’, ‘झिपरु’ आणि पाठ्यपुस्तकातील कवितांचा रसास्वाद हे बालसाहित्य प्रकाशित झाले आहे.
सन २०२२ मध्ये पियूची वही या पुस्तकाला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त झाला असून या पुस्तकाचा हिंदी अनुवादही झाला आहे. हे पुस्तक वाचकप्रिय आहे. तसंच झिपरु हे पुस्तक आता नाट्यरुपात पाहायला मिळणार आहे. याबरोबरच ताईंचे ‘दिवसाच्या वाटेवरुन’ व ‘अंतरीच्या गर्भी’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कवितांचे व पुस्तक अभिवाचनाचे कार्यक्रमही होत असून शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिकांकडून ते कार्यक्रम नावाजले आहेत. यातील लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद आहे. संगीताताईंनी अनेक गीतंही लिहिली आहेत.
इतर सन्मान –
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचं अध्यक्षपद ताईंनी भूषविलं असून त्या कारकिर्दीत बालसाहित्य संमेलनांचं आयोजन, स्पर्धा, शाळांमध्ये जाऊन साहित्यविषयक कार्यक्रम, पुरस्कार असे उपक्रम राबवले. राज्यभरातील १००-१५० शाळांमध्ये ताईंना लेखक भेटीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचं तसंच डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान ताईंना मिळाला आहे. वैद्यकीय व लेखन क्षेत्रात एवढी भरारी घेण्यासाठी ताईंना पतीची अखंड साथ लाभली. ते नामवंत शास्त्रीय गायक आहेत. ताईंच्या दोन्ही कन्या आज संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्याला पुरेसं स्थान दिलं जातंय का? –
एकूणच मराठी साहित्यात आता बालसाहित्याला चांगलं स्थान मिळतयं. बालसाहित्य संमेलनं होत आहेत. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्याला आणखी भक्कम स्थान मिळायला पाहिजे व ते निश्चितच मिळेल, असा ताईंना विश्वास वाटतो.
बालसाहित्यकार मोजकेच आहेत का ? आणि उत्तम बालसाहित्यकार कसे घडतील? –
संगीताताई म्हणतात, लहानांसाठी लिहिणारे लेखक आता वाढलेत. दर्जेदार बालसाहित्य निर्माण होण्यासाठी लेखकांनी सातत्याने वाचन करायला हवं, लहान मुलांना काय आवडेल याचा विचार करायला हवा आणि लेखनाचे कष्ट घ्यायला हवेत. लेखकांबरोबर चित्रकार व प्रकाशकांनीही पुस्तकं कशी रंगीत, आकर्षक होतील याकडं लक्ष द्यायला हवं.
मोबाईलच्या दुनियेतून मुलांना पुस्तकांकडं कसं वळवायचं? –
मोबाईलच्या या काळात अनेक मुलं वाचू लागली आहेत, लिहू लागली आहेत. लहान मुलांना पुस्तकांची गोडी लावणं आव्हानच आहे. पण, हस्तलिखित बनवणे, बालवाचनालय, मित्रमैत्रिणींच्या पुस्तकांची देवाणघेवाण अशा उपक्रमातून मुलांना नक्कीच वाचनाची-लिहिण्याची गोडी लागेल. म्हणूनच या सुट्टीत आपल्या घराजवळच्या सर्व मित्रमैत्रिणींनी आपल्याजवळची गोष्टींची पुस्तकं, इतर पुस्तकं एकत्र करायची आणि ती वाचून काढायची आहेत. पालकांना यासाठी मुलांना मदत करायची आहे. मुलांना मोठा आनंद मिळेल.
लहानग्याकडून बक्षीस –
संगीताताई एकदा कार्यक्रमासाठी गेल्या असताना ताईंच्या कविता ऐकल्यानंतर एका चिमुकल्या मुलानं त्याची खेळण्यातली इवलीशी कारगाडी ताईंना भेट दिलीये. ती कार ताईंनी इतर बक्षिसांबरोबर आणि मनातही जपून ठेवलीये.
अधिक वाचा –
– मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार
– लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
– बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने हळहळ; गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला कराळे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर । Vadgaon Maval