देशात आज (दि. 4 जून) लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. देशातील 543 मतदारसंघात मतमोजणी सुरू असून एनडीएला धक्का देणारे निकाल समोर येत आहेत. एनडीएच्या 400 पार जागांच्या स्वप्नांना सुरंग लागल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली असून महायुतीला जोरदार फटका बसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. 4 जून) मतमोजणी सुरु असतानाच पत्रकार परिषद घेत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच एका पत्रकाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय म्हणालेत शरद पवार?
“लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना ( उ.बा.ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादा पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटीबद्ध होती. ह्या भुमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि म.वि.आ. वर विश्वास दाखवला याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.”
“श्री. राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते श्री. नाना पटोले, श्री. बाळासाहेब थोरात, श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भुमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द आपणास देतो.”
“ह्या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे. ह्यात महाराष्ट्राची प्रमुख भुमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू. अतिशय संचर्षपुर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली त्याबद्दल जनतेचे मी पुन्हा कण व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद !” ( Lok Sabha Election 2024 Results Live Updates Sharad Pawar reaction on Nikal )
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं