मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा संजोग वाघेरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. कासारवाडी येथे झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणे यांनी, माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे, हे मला माहीत नाही, असे विधान करत संजोग वाघेरे यांना महत्व देत नसल्याचे दाखवून दिले होते. परंतू आता बारणे यांच्या त्याच विधानाचा संजोग वाघेरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. इतकेच नाहीतर वाघेरेंनी बारणेंवर जहरी टीका सुद्धा केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही बाजूंनी युती आणि आघाडीत घटक पक्षांचे मेळावे घेणे, पदाधिकाऱ्यांशी संवाद करणे ह्या प्रक्रियेला जोर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिथे जिथे शक्य होईल, तिथे तिथे दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. ( Maval Lok Sabha Constituency Candidate Shrirang Barane And Sanjog Waghere Verbal Argument )
नुकतीच महायुतीची कासारवाडी येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बारणे यांनी, ‘माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे. हे मला माहीत नाही, उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला उमेदवार कळेल.’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून आता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘श्रीरंग बारणे यांचे विधान हे बालिशपणाचे असून 1987 सालापासून मी राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत आहे. आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात राहत आहोत, तरी ते मला ओळखत नसतील तर तो त्यांचा अहंकार आहे.’ अशा शब्दात वाघेरे यांनी बारणेंचा समाचार घेतला. इतकेच नाही तर संजोग वाघेरे यांनी रावणाचे उदाहरण देत ‘रावणाचा देखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे बारणेंनी विसरू नये. त्याचप्रमाणे श्रीरंग बारणेंच्या अहंकाराचा मतदार अंत करतील,’ असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना ‘संकल्प नशामुक्तीचा’ डोस, विद्यार्थ्यांवर राहणार ‘करडी’ नजर
– हुश्श..! अखेर लाईट आली, मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीज पुरवठा सुरळीत, महापारेषण आणि महावितरणचे शर्थीचे प्रयत्न
– दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News