मावळ लोकसभेत सलग तिसऱ्यांदा खासदार श्रीरंग बारणे यांना यश मिळाले आहे. बारणेंनी तब्बल 96 हजार मतांच्या फरकाने महाविकासआघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांना पराभूत केले. बारणेंचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक आहे. मावळमधून सलग तिसऱ्यांदा कोणत्याही लोकप्रतिनिधीने निवडणूक मारण्याची ही पहिलीच वेळ. श्रीरंग बारणेंच्या विजयात अनेकांचा वाटा आहे. त्यातही महायुतीतील घटकपक्षांचा मोठा वाटा आहे. परंतू मावळ लोकसभा अंतर्गत मावळ विधानसभेत जेव्हा महायुतीचा विचार केला जातो, तेव्हा मात्र बारणेंना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा न मिळालेल्या आघाडीचीच चर्चा सर्वाधिक होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळमध्ये महायुतीची सत्ता –
मावळ विधानसभा क्षेत्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहे. त्यातही आजी माजी आमदार हे सर्वजण सध्या महायुतीचे घटक आहे. सुरुवातीला या दोन्ही घटकपक्षांनी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतू नंतर महायुतीकडून बारणेंना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षादेश मानून दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी बारणेंच्या प्रचारात गुंतले. पदाधिकारी, नेते हे जरी बारणेंचा प्रचार करत राहिले तरीही तळागाळातील कार्यकर्ता मात्र बारणेंवर नाराज असल्याची चर्चा शेवटपर्यंत होत राहिली. त्यातच निकालानंतर जेव्हा बारणेंना मावळात फक्त 4935 मतांची आघाडी मिळाल्याचे समोर आले, तेव्हा मताधिक्य कुणामुळे कमी झाले, याबद्दल जोरदार चर्चा होत आहे.
स्वतः बारणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना अपेक्षित काम न केल्याचा आरोप केला होता. परंतू नंतर लगेचच त्यांनी पदाधिकारी आणि आमदार, नेते यांनी काम केल्याचे म्हटले होते. त्यावर आमदार सुनिल शेळकेंनी हा आरोप फेटाळून लावत, आमच्यावर खापर फोडू नका असेल सुनावले होते. दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघडउघड बारणेंच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. आम्ही नोटाला मतदान करू पण बारणेंना नाही, असा पवित्रा घेतला होता, त्यामुळे हा नाराज कार्यकर्ता मतांच्या बाबतीत बारणेंसोबत किती राहिला हाही प्रश्न आहे. ( Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barane won Maval Assembly Sunil Shelke Bala Bhegade )
अखेरीस विद्यमान आणि माजी आमदार सोबत असतानाही आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांचा धडाका होऊनही मावळ विधानसभेतील मतदारांनी दिलेला कौल महायुतीच्या नेत्यांसाठी विचार करायला लावणारा आहे. त्यातही कुठलाही चेहरा नसताना तालुक्यात महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले काम वाखण्याजोगे आहे. वाघेरेंना महाविकासआघाडी म्हणून मावळ विधानसभेत जे मतदान झाले, त्यातून महाविकासआघाडीला नक्कीच उर्जा मिळाली असणार, यात काही शंका नाही.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)
– “मतदारांचा कौल मान्य, निवडणूकीत जय-पराजय होतात, पण..”, मावळ लोकसभेतील पराभवानंतर संजोग वाघेरेंची प्रतिक्रिया, वाचा
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया