इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या उपाययोजनांना गती देऊन त्या कालबद्ध रितीने पूर्ण कराव्यात. या उपाययोजनांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तिथे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. याबैठकीला स्वतः जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाचे अधिकारी, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषद आणि देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे, वारकरी डी. डी. भोसले पाटील आदी उपस्थित होते. ( meeting to prevent Indrayani river water pollution )
‘इंद्रायणी नदी हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून नदीमध्ये प्रदुषित सांडपाणी येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलपणे याकडे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व नगरपरिषदांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा घालून त्याप्रमाणे कामाला गती देणे आवश्यक आहे,’ असे जिल्हाधिकारी म्हटले.
‘लोणावळा नगरपरिषदेच्या एसटीपीच्या अनुषंगाने रेल्वे क्रॉसिंगबाबत परवानगीसाठी गतीने पाठपुरावा करण्यात येईल. तळेगाव येथील कार्यान्वित न होऊ शकलेल्या एसटीपीचा क्षमतावाढीचा आराखडा तयार करावा. देहू नगरपंचायतीनेही अल्पमुदतीच्या उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात. आळंदी येथील एसटीपी विहित कालमर्यादेत पूर्ण करावा,’ असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”
‘मावळ तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्यावर अभिनव पद्धतीने प्रक्रिया करुन त्याचा गावातच पुनर्वापर केल्यामुळे नदीमध्ये अजिबात सांडपाणी सोडले जात नाही. कान्हे गावाने केलेल्या उपाययोजना जिल्हा परिषदेने इतरही गावात राबवून नदीत सोडले जाणारे सांडपाण्याचा पुनर्वापर करावा. तसेच नदीकाठच्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये 100 टक्के शोषखड्ड्यांचा उपक्रम राबवावा,’ असे जिल्हाधिकारी म्हणाले.
‘सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता, जलप्रदुषण रोखणे आदीच्या अनुषंगाने दरमहा उपक्रम राबवावेत. त्यात शाळा, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सहभाग वाढवावा. सांडपाणी प्रकल्प आराखडे, उभारणी, निधी आदींच्या अनुषंगाने आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक मदत उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. नदी पुनुरुज्जीवनाच्या उपाययोजनांमध्ये पीएमआरडीएलाही सहभागी करुन घेण्यात येईल,’ असेही यावेळी डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या.
अधिक वाचा –
– तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री
– वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार