Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण बारणे यांच्या निवडीला पराभूत अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर, नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला अगोदरच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याबद्दलच्या याचिका प्रलंबित आहेत. अशात आता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूकीला आव्हान देणारी याचिका पराभूत उमेदवाराने दाखल केल्याने याची चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग आप्पा बारणे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आप्पा बारणे हे 6 लाख 92 हजार 832 मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव केला. होता. यासोबत रिंगणात असलेल्या एकूण 30 उमेदवारांचा पराभव झाला होता. परंतु यापैकी पराभूत अपक्ष उमेदवार वकील राजू पाटील यांनी बारणे यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मतमोजणी आणि प्रचारावेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पाटील यांनी बारणे यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ( petition filed in High Court by defeated candidate Raju Patil against Maval Lok Sabha MP Shrirang Barane )
काय आहे प्रकरण ?
मावळ लोकसभेसाठी करण्यात आलेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडा यामध्ये जवळपास 573 मतांची तफावत आढळून आली आहे. याशिवाय, मतमोजणी सुरू असताना अनेक अनोळखी व्यक्ती मतमोजणी केंद्रावर फिरत होत्या. याविषयी रीतसर तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने न्यायालयात याचिका केल्याचा दावा राजू पाटील यांनी याचिकेत केला आहे.
तसेच, श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोपही त्यांनी याचिकेत केला असून दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे याचिकेसह जोडले आहेत. श्रीरंग बारणे यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. यापूर्वी, 1988 मध्ये असा प्रकार घडला होता. त्यावेळी, तत्कालीन आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती, असेही पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे आता याचिकेची सुणावणी कधी होणार आणि कोर्ट काय म्हणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा –
– महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News
– ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी पवनानगर येथे प्रभातफेरी ; विद्यार्थ्यांची भर पावसात तिरंगा रॅली । Pavananagar
– मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News