Dainik Maval News : राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सहकारी संस्थांनी १८ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केले आहे.
या पुरस्कारांतर्गत ‘सहकार महर्षी’ पुरस्कार-१ , ‘सहकार भूषण’- २१ तसेच ‘सहकार निष्ठ’- २३ असे एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असून अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
पात्र संस्थांच्या निवडीसाठी संस्थाप्रकारनिहाय नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, व दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक,व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक, धर्मादाय प्रयोजनासाठी केलेली मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत.
शासन स्तरावरील समितीमार्फत २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन
– आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार
– Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श