Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथे केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ ते ३३ तास वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांचे यात अतोनात हाल झाले. परंतु बुधवारी रात्री उशीरा अपघातग्रस्त कंटेनर हटवून द्रुतगती मार्गावरील मुंबई पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरम्यान महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होत असताना लोणावळ्यात मात्र एका बंद कंटेनरमुळे पुन्हा वाहतूककोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात एक सिमेंटचा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. महामार्ग पोलीस आणि आयआरबीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. क्रेनच्या साहाय्याने हा कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तोपर्यंत वाहनांचा ओघ वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
खंडाळा घाटातील ३२ तासांच्या खंडानंतर रात्री उशिरा वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने आणि प्रचंड कोंडीमुळे वैतागलेले चालक आपल्या वाहनातच झोपून गेले होते. सकाळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना या वाहनचालकांना झोपेतून उठवून गाड्या पुढे नेण्यास सांगावे लागले.
सध्या लोणावळ्यापासून २० किलोमीटर आधीपासूनच वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या दोन तासांत अनेक वाहने जेमतेम दोन किलोमीटर पुढे सरकू शकली आहेत. मावळ परिसरातून एक्सप्रेस वेवर येणाऱ्या प्रवाशांना या भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे. लोणावळ्याजवळ अजूनही ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा कायम आहेत.
मावळ परिसरात परिस्थिती गंभीर
टँकर हटवल्यानंतरही या महामार्गावरील कोंडीचे परिणाम पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात प्रकर्षाने जाणवत आहेत. लोणावळा ते तळेगाव या पट्ट्यात वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. एक्सप्रेस वेवरील कोंडी टाळण्यासाठी अनेक चालकांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा आधार घेतला. मात्र तिथेही वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध वाहन उभे करून झोपू नका, जेणेकरून वाहतुकीचा प्रवाह सुरू राहण्यास मदत होईल, अशी विनंतीही करण्यात आली आहे. बोरघाटातील वाहतूक हळूहळू मूळ पदावर येत असली तरी मावळ आणि लोणावळ्यातील वाहनचालकांना मात्र अद्याप मनस्ताप सहन करावा लागत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो