Dainik Maval News : नसरापूर ( ता. भोर ) येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी ( दि. २ मे ) पुणे येथील धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांना दिला. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
या प्रकरणात खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्युदंडापर्यंतची शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे सांगितले.
दरम्यान, हे अमानुष कृत्य करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात सबळ पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सदर प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असून यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे. तसेच पॉक्सो कायद्यानुसार आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून, दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा ठाम इशाराही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.
नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल
नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक आहे.या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे.
या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे. बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती
