Dainik Maval News : मावळ तालुक्यात गेली चार पाच दिवसांपासून मुसळधार मान्सून बरसत आहे. यातही रविवार, सोमवार दोन्ही दिवस अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. यामुळे सर्वच नद्यांना पूर आला असून गावखेड्यातील, डोंगराळ भागातील ओढे-ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे धरणांतील पाण्याचा येवा वेगाने होत असून वाढला असून धरणांतील पाणीसाठ्यांत वाढ झाली आहे. मावळातील वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी, मळवंडी ठुले, आढले, पाचाणे येथील जलाशये पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पवना धरण पन्नाशी पार –
पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात सध्या पाण्याची आवक वेगाने होत आहे. अवघ्या दोन तीन दिवसांत पवना धरणाने पन्नाशी ओलांडली आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात ५५.०७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला तो ७७.२८ टक्के होता. तसेच धरण क्षेत्रात २४ तासांत ४२६ इतका विक्रमी पाऊस झाला आहे.
कासारसाई धरण – पाणीस्थिती व दक्षता सूचना
कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे आज (दि. ७ जुलै) रोजी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यातून ४,१९४ क्युसेक्सवरून ६,२१६ क्युसेक्स इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. पाऊस सुरू राहिल्यास किंवा वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते.
जाधववाडी लघु पाटबंधारे तलाव –
जाधववाडी ल. पा. तलाव १०० % भरलेला आहे. सदर तलाव हा द्वारविरहित असून, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तलावामध्ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या तलावातून सुधा नदीमार्गे इंद्रायणी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू, आळंदी ते तुळापूर परिसरात नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणीही उतरू नये, जनावरे, शेतीपंप, वाहने व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
वडीवळे धरण –
वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी वडीवळे धरणाच्या सांडव्यावरील दरवाज्यांद्वारे नदीपात्रामध्ये ८,९३५ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे. पाऊस सुरू राहिल्यास अथवा वाढल्यास तसेच धरणामध्ये येव्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास परिस्थितीनुसार सदर विसर्गामध्ये कमी अथवा जास्त बदल करण्यात येऊ शकतो
लोणावळा धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
