Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पाटण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावातील नागरिकांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु संपूर्ण गाव रिकामे झाल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 16 घरांमध्ये घरफोडी केली आहे.
चोरट्यांनी घरांची कुलपे आणि दरवाजे तोडून प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट, लॉकर आणि सामानाची मोठ्या प्रमाणात उलथापालथ केली. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड तसंच इतर मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे. काही घरांमध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकल्याने ग्रामस्थांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
पाटण येथे दरड कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर भीतीच्या वातावरणात प्रशासनाने गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव गाव सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक कुटुंबे नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित निवाऱ्यांमध्ये गेली होती. मात्र, याच परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने गावातील घरांना लक्ष्य केले.
ग्रामस्थ जेव्हा परत आपल्या घरी आले, तेव्हा घरांचे दरवाजे तुटलेले, कपाटे उघडलेली आणि सामानाची नासधूस झालेली पाहून त्यांना मोठा धक्का बसला. दुर्घटनेमुळे आधीच दुःखी असलेल्या कुटुंबांवर या चोरीमुळे आणखी एक संकट ओढवले आहे. अनेकांनी आयुष्यभराची जमापुंजी आणि दागिने गमावल्यानं संताप आणि हतबलता व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कामाला लागली आहेत. या प्रकारामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा आपत्कालीन परिस्थितीत रिकाम्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
