Dainik Maval News : पाटण गावात (ता. मावळ) सोमवारी (दि. ६ जुलै) पहाटे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जीव गेला. या दुर्दैवी दुर्घटनेनंतर प्रशासन पुन्हा जागे झाले असून मावळ तालुक्यातील धोकादायक गावे, वस्ती यांचा सर्व्हे सुरू केला असून आवश्यक तिथे नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे. परंतु आजपर्यंतचा अनुभव पाहता अशा हृदयद्रावक दुर्घटना एकदा की जुन्या झाल्या, किंवा काळ थोडासा पुढे गेला की, प्रशासनाचे या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष होते. त्यामुळे डोंगराच्या कुशीत राहणारे ग्रामस्थ पुन्हा “डोंगर उशाला अन् धोका जीवाला” याप्रमाणे आपलं जीवन जगत राहतात. प्रशासन आणि नेते हेही पुन्हा एखादी दुर्घटना होईपर्यंत झोपी जातात.

पाटण दरड दुर्घटनेनंतर मावळमधील दरड प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यापूर्वीही माळीण, तळीये, इरशाळवाडी या ठिकाणच्या दुर्घटनांनंतर मावळातील डोंगर पायथ्याला व अगदी डोंगर कुशीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्व ऐरणीवर आला होता. प्रशासनानेही तालुक्यातील बोरज, सावळा, तुंग, माऊ, लोहगड, ताजे, मालेवाडी या गावांचा मुख्य दरड प्रवण क्षेत्रामध्ये समावेश केला आहे.
याव्यतिरिक्त नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळात काही गावे, वस्त्या या थेट सह्याद्रीच्या कुशीत आहेत. त्यांनाही दरड कोसळण्याचा धोका आहे. तसेच, अलीकडे प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून (??) अनेक ठिकाणी डोंगर, टेकड्यांच्या पायथ्याला किंवा मध्यात नवनवे बंगलो, प्रकल्प उभे राहताना दिसतात, त्यामुळे दरडप्रवण क्षेत्रात नव्याने काही क्षेत्रांची भर पडत आहे.
एकूणच तालुक्याचा विचार करता, दरड कोसळण्याच्या शक्यतेने प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणे, उपाययोजना करणे गरजेचे आहे. अति संवेदनशील गावांचा सर्वे, पाहणी करणे आवश्यक असून केवळ सर्व्हे, पाहणी वर न थांबता तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.
सोमवारी पाटण गावात दरड कोसळली, पण पाटणसह भाजे, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, देवले, पाथरगाव, सांगिसे, नेसावे, पाले, मोरमारवाडी, जांभवली, घोणशेत, साई, कचरेवाडी, वाउंड, टाकवे बु., कुसवली, कांब्रे, गबालेवाडी, कळकराई ही गावे येथील काही वस्त्या याही डोंगरांच्या कुशीत आहेत. तिथेही प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून नागरिकांना खबरदारीच्या सूचना द्यायला हव्यात, आवश्यक असल्यास ग्रामस्थांचे स्थलांतरण करणे, पुढे जावून गावांचे पुनर्वसन करणे आदी पाऊले उचलली पाहिजेत. नागरिकांनीही खबरदारी बाळगली पाहिजे.
आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जी काही धोकादायक गावे, वस्त्या आहेत, त्या ठिकाणी नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्याअनुंषगाने सर्व आप्तकालीन यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य केले पाहिजे. – सुनील शेळके, आमदार मावळ
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
