Dainik Maval News : कारमधून लोणावळ्याला फिरण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांसह दुबईहून आलेल्या एका दाम्पत्याला अडवून गाडीत ड्रग्ज असल्याचे खोटे सांगत ६ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. तसेच ५ लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना तब्बल ७ तास ओलीस ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ६ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य महामार्ग पुणे विभागाचे दोन पोलीस शिपाई, एक पोलीस नाईक यांच्यासह तीन वॉर्डन अशा सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाणार असल्याचे राज्य महामार्गचे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. याप्रकरणी पुण्यातील विमाननगर येथील २८ वर्षीय तरुणाने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे पुणे येथील एका कंपनीत काम करतात. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांचे मित्र मोहम्मद काशान आझमी (२८), त्यांची पत्नी आणि मेव्हणे सय्यद जुबेर अहमद हे काही दिवसांपूर्वीच दुबईहून पुण्यात फिरण्यासाठी आले होते. ६ जुलै २०२६ रोजी हे चौघे जण कारमधून रात्री ८:३० च्या सुमारास लोणावळ्यातील प्रसिद्ध मॅप्रो गार्डन येथे फिरण्यासाठी निघाले होते.
कार कामशेत परिसराजवळ पोहोचली असता, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ६ अज्ञात पोलिसांनी प्रवाशांची गाडी अडवली. “आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीची झडती घ्यायची आहे,” असा बहाणा त्यांनी केला. गाडीत काहीही संशयास्पद नसताना त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना धमकावण्यास सुरुवात केली. तुमच्या गाडीत गांजा किंवा ड्रग्ज आहे, ते काढून द्या. नाहीतर तुमच्यावर मोठी कारवाई करू, अशी धमकी त्यांनी दिली.
यादरम्यान आरोपी पोलिसांना कारमध्ये अँबर लीफ कंपनीचे एक सिगारेटचे पाकीट सापडले. याच पाकिटावरुन धमकावत, पोलीस कारवाई नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी थेट खंडणीची मागणी या पोलिसांनी केली. त्या पोलिसांनी कारमधील सर्वांचे मोबाईल काढून घेत कोणाशीही संपर्क साधू दिला गेला नाही. त्या पोलिसांनी चौघांना त्यांच्याच कारमध्ये डांबून ठेवले आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ७ तास त्यांना ओलीस ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. शेवटी, ५ लाख रुपये वसूल करण्यासाठी हे पोलीस पर्यटकांना तळेगाव येथील एका एटीएम सेंटरवर घेऊन गेले.
मोबाईल हिसकावले असले तरी एका तरुणाच्या हातातील स्मार्ट वॉचकडे आरोपी पोलिसांचे लक्ष गेले नाही. याचाच फायदा घेत, एका तरुणाने गुपचूप आपल्या स्मार्ट वॉचवरून पुण्यात राहणाऱ्या एका मित्राला इमर्जन्सी हेल्पचा मेसेज पाठवला. त्या मित्राने तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि त्यांचे तीन उपायुक्त तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. पिंपरी पोलिसांची पथके तळेगावच्या दिशेने रवाना झाली. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आणि पर्यटक इतर पोलिसांशी संपर्क साधत असल्याचे लक्षात येताच, कारमध्ये बसलेले दोन आरोपी पोलीस तातडीने उतरले आणि आपल्या कारमधून पसार झाले.
सुरुवातीला पिंपरी पोलिसांना हे कृत्य एखाद्या सराईत टोळीचे असावे असा संशय होता, मात्र तपासानंतर हे अपहरणकर्ते पुणे ग्रामीण पोलीस दलातीलच कर्मचारी असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे पोलीस वर्तुळात तीव्र संताप आणि खळबळ व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पोलिसांवर काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२७(२), ३०८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश घनश्याम पवार करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
