पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर सुहास दिवसे यांची 7 फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली आहे. त्याआधी मागील चार वर्षापासुन सुहास दिवसे पुण्यात महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी आयोगाकडे केली आहे. दिवसे यांच्या बदली बरोबर इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवर देखील कुंभार यांनी आक्षेप घेतला आहे आणि त्या विरोधात देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सुहास दिवसे जुलै 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पीएमआरडीए चे आयुक्त होते त्यानंतर सप्टेंबर 2022 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात क्रीडा आयुक्त म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली होती,सात फेब्रुवारीला पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली. तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी, असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. दिवसे यांच्या बदलीने या नियमाचा भंग झाला आहे. किंवा निवडणूक आयोगाचा नियम डावलून दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच दिवसे यांची जिल्हाधिकारी पदावर झाल्याने तेच जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. (AAP Requested Election Commission To Cancel Appointment Of Newly Appointed Pune District Collector Suhas Diwase)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलांचे काय निकष आयोगाने घालून दिले आहेत?
21 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्याचे निकष ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात झाला असेल मात्र संबंधित अधिकारी निवडणुकीची संबंधित काम करणार नसेल तर तो जिल्ह्यात राहू शकतो. मात्र भविष्यात अशा अधिकाऱ्याकडे निवडणुकीशी संबंधित काम देण्यात येऊ नये, अशी अट आयोगाने घातलेली आहे. याच अटीचे उल्लंघन दिवसे यांची बदली करताना झालेले आहे.
दिवसे जवळपास चार वर्ष पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत आणि आता त्यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असणार आहे. तसेच दिवसेंना वेगळा न्याय कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय दिसून येतो. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदार, प्रांत, अपर जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, डी.वाय.एस.पी. अशा अधिकाऱ्यांच्या सरसकट बदल्या करण्यात आल्या. निकषात बसत नसलेल्या मात्र तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात काम केलेल्या सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या सरसकट बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसेंना वेगळा न्याय आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय अशी सरकारची भूमिका असल्याची टीका होतेय. म्हणूनच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना ‘रज्जो’ औषधाचे वाटप
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School