Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्याने भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे लोहगड आणि धालेवाडी येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून डोंगराला भेगा असल्याने प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डोंगराला भेगा पडल्याते दिसताच गुराख्यांनी अगोदर ग्रामस्थांना सतर्क केले. त्यानंतर तहसीलदार, गावकामगार तलाठी आदी अधिकाऱ्यांनी तिथे प्रत्यक्ष पाहणी केली. गावावर दरड कोसळण्याची भीती मनात बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोहगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड आणि धालेवाडी गावाला या प्रकारामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. लोहगड गावामध्ये सुमारे 500 ते 600 लोकवस्ती असून धालेवाडी गावामध्ये 250 ते 300 लोकवस्ती आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे याठिकाणी डोंगराला भेगा पडल्याचे डोंगरावर जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती गावकरी आणि त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच प्रशासन ग्रामस्थांच्या सतत संपर्कात असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे. ( Cracks in the mountain near Lohgad Dhalewadi village in Maval taluka possibility of landslide )
परिसरात यापूर्वी झाले आहे भूस्खलन –
लोहगड परिसरात याठिकाणी 1989 साली मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन लोहगड येथील तीन ते चार घरे त्यामध्ये गाडली गेली होती. तर अनेक जनावरे मृत झाली होती. तसेच सन 2006 साली याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन धालेवाडी येथील शेतकऱ्यांची भात शेती त्यात गाडून गेली होती. तसेच परिसरातील भाजे गावातही दरड कोसळण्याची घटना यापूर्वी घडलेली आहे.
तहसीलदार देशमुख यांची प्रतिक्रिया –
या घटनेबद्दल बोलताना तहसीलदार विक्रम देशमुख म्हणाले की, मागील आठवड्यात येथे जोरदार अतिवृष्ठी झाली होती. जोरदार पावसामुळे डोंगराचा जो भाग मऊ आहे, तिथे भेगा पडल्या आहेत. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तरी देखील भूगर्भशास्त्र विभागाकडे हे कशामुळे झाले आहे, ते समजण्यासाठी पाठवले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला खरे कारण समजेल, तोवर प्रशासन गावातील नागरिकांच्या संपर्कात आहे.
अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News