Dainik Maval News : करंजगांवचे माजी सरपंच आणि जनसंघ व भारतीय जनता पार्टी मावळचे ज्येष्ठ नेते कै. पांडुरंग दादा धोंडिबा उंडे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज ( दि. २ मे ) पहाटे ३:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपाचा एक सच्चा आणि जुन्या पिढीतील कार्यकर्ता हरपला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून आणि स्व. नथुभाऊ भेगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यामध्ये कै. पांडुरंग दादा धोंडीबा उंडे यांनी जनसंघाचे कार्य जोमाने केले. नाणे मावळ आणि आंदर मावळ यांसारख्या दुर्गम भागात त्यांनी पायी प्रवास करून जनसंघाचे विचार पोहोचवले आणि खऱ्या अर्थाने या भागात नवीन कार्यकर्ता घडवण्याचे व त्यांना योग्य दिशा देण्याचे काम केले.
’आदिवासी नेता’ म्हणून पांडुरंग दादा मावळ आणि मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात अत्यंत लोकप्रिय होते. आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
जनसंघातील दिग्गज सहकाऱ्यांची साथ :
त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांना कै. रामभाऊ म्हाळगी, कै. कृष्णराव भेगडे, कै. बाबुरावजी घोलप, कै. कांचनभाई शहा, कै. शिवराम बुवा येवले, कै. बळवंतरावजी मामा शेलार, कै. विश्वनाथ भेगडे, कै. नामदेवराव दौंडे, कै. मारुती बाबा शिंदे, कै. जिजाबा शिंदे आणि कै. बबनराव तांबोळी अशा ज्येष्ठ नेत्यांचा सहवास लाभला. याच दिग्गज मंडळींनी मावळ तालुक्यात जनसंघ ते भारतीय जनता पक्षाची मुळे घट्ट रोवली.
त्यागाची आणि संघर्षाची गाथा :
पांडुरंग दादा हे जहालवादी विचारांचे आणि तत्त्वाशी तडजोड न करणारे नेतृत्व होते. आदिवासी समाजासाठी त्यांनी अनेक वेळा सत्याग्रह केला आणि तुरुंगवास भोगला. ऐतिहासिक सिमला कराराच्या निषेध आंदोलनातही त्यांनी कारावास सोसला. असंख्य कार्यकर्ते घडवून त्यांनी पक्षसंघटना मजबूत केली.
शनिवारी जेव्हा त्यांचे अंत्यविधी करण्यात आले, त्यावेळी अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या पार्थिवावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा ठेवण्यात आला होता. हे त्यांच्या आयुष्यभराच्या त्यागाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे. पांडुरंग दादा यांच्या जाण्याने मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
(शब्दांकन: अभिमन्यू शिंदे)
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी
– ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला चालना
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल

