Dainik Maval News : इंधन संरक्षण आणि खाद्यतेलाची बचत ही केवळ आर्थिक गरज नसून ती देशाप्रती असलेली जबाबदारी आणि देशभक्तीची भावना आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष सायली जितेंद्र बोत्रे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे देशभर राबविण्यात येत असलेल्या “इंधन संरक्षण व खाद्यतेल बचत जनजागृती अभियान” अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम देशभर यशस्वीपणे राबविला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
बदलती जीवनशैली, वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि ऊर्जा बचतीची आवश्यकता लक्षात घेता कमी तेलाचा वापर, संतुलित व पौष्टिक आहार तसेच इंधनाची काटकसरीने बचत करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेत महिलांना गॅसचा योग्य वापर, इंधन बचतीचे विविध उपाय तसेच कमी तेलात पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानांतर्गत पुणे उत्तर जिल्ह्यातील विविध मंडलांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी जनजागृती उपक्रम राबविले. तळेगाव येथे मृदुला भावे, पवन मावळ मंडलात चैत्राली गराडे, देहूरोड मंडलात बॉबी डिगा, शिरूर पूर्व मंडलात दिपाली पडवळ, शिरूर पश्चिम मंडलात कमल भुजबळ, शिरूर बेट मंडलात कविता गावंडे व जयश्री कोहकडे, शिरूर शहरात भाग्यश्री गायकवाड व अनघा पाठक, हवेली मंडलात अर्चना भायवाल, चाकण मंडलात मालिनी शिंदे व अरुणा पगारे तसेच राजगुरूनगर येथे भाग्यश्री बोरकर यांनी अभियान प्रभावीपणे राबविले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुमित्रा यादव, रत्ना पिंगळे, स्वप्ना खामकर, कल्याणी ठाकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.





