Dainik Maval News : पुणे-मुंबई महामार्गावरील १५ अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्रांची एमएसआरडीसीकडून दुरूस्ती करण्यात आली आहे. पर्जन्यकाळ तोंडावर आल्याने पावसाळ्याच्या दिवसांत होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील १५ अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती केली. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. मागील वर्षी याच भागात वेगवेगळ्या अपघातांत सुमारे ८८ जणांचा मृत्यू झाला होता.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे काही भाग अपघातप्रवण म्हणून ओखळले जातात. त्यावर महामंडळाने सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या मदतीने विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. यातील १५ अपघातप्रवण स्थळांची पडताळणी करून आकडेवारीच्या आधारे आणि अभियांत्रिकी उपायांतून तोडगा काढण्यात आला आहे.
त्यामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूमुखी पडणार्यांच्या संख्येत घट झाली आहे. सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथील टोल नाक्याजवळील पेट्रोल पंपापासून महानगर गॅस लिमिटेड कंपनीपर्यंत असलेल्या भागातील १५ अपघातप्रवण स्थळांचा यामध्ये समावेश आहे. त्यातही प्रामुख्याने वडगाव फाटा, कामशेत घाट परिसर, शिलाटणे फाटा आणि खालापूर भागाचा समावेश आहे.
महामार्गावर करण्यात आलेल्या उपाययोजना
अपघातप्रवण भागातील दुरुस्तीमध्ये कमी दृश्यमानता, पादचार्यांना असणारा धोका, वेगाने येणार्या वाहनांसाठी गतिरोधक, यांवर काम केले गेले. तसेच, या ठिकाणी मध्यवर्ती बंदिस्त भिंत अर्थात डिव्हायडरचा वापर, वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त असुरक्षित पद्धतीने वाहने चालविणार्यांवर कारवाई करण्यासाठी कॅमेर्यांचा वापर होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती