पुणे ( प्रतिनिधी – संध्या नांगरे) : थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांचा तेजोमय जीवनपट आपल्या तडफदार आवाजातील पोवाड्यांमधून शाहीर विनता जोशी (वय 56) (Shahir Vinata Joshi) असंख्य लोकांपर्यंत पोचवत आहेत. एखाद्या व्रतासारखं गेली 40 वर्षं अव्याहतपणे विनताताई हे कार्य त्याच मोठ्या उत्साहानं नि तळमळीनं करत आहेत. मनामनांवर देशसेवेचा संस्कार करणारं विनताताईंचं अनमोल कार्य प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी मुलाखतीद्वारे जाणून घेतलंय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या संवादातून उलगडलेली विनताताईंची वाटचाल प्रत्येक नागरिकाला देशसेवेची प्रेरणा देणारी आहे. शिवाय शाहिरी कलेचं महत्व सांगणारी व ती आत्मसात करण्यास प्रोत्साहन देणारी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रश्न : ताई, तुमच्या शाहिरी कारकिर्दीची सुरवात कशी झाली ? आणि तुमच्या बालपणाविषयीही सांगा.
विनताताई : मी मूळची नाशिकची आहे. माझं शालेय-महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्येच झालं. सारडा कन्या विद्यालयात शालेय शिक्षण झालं आणि आर.वाय.के. महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयातून विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली. शाळेत असतानाच माझे पोवाड्याचे कार्यक्रम सुरु झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर हे माझे आजोबा. आजोबा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले पोवाडे, गाणी विविध कार्यक्रमांत गायचे, त्याचं सादरीकरण फार उत्तम असायचं असं आजी सांगायची. आजोबांची कला माझ्यात उतरली आहे. मला गाण्याची आवड असल्यानं थोडंफार गाणं शिकले. ( Life Journey And Interview Of Famous Shahir Vinata Joshi Pune )
- शाळेत वक्तृत्व-नाट्य स्पर्धेत मी बक्षीसं मिळवायचे. पोवाड्याचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. मी इयत्ता नववीत असताना आमच्या शाळेत पाहुण्या आलेल्या बाईंनी झाशीच्या राणीचा पोवाडा आम्हाला म्हणून दाखवला होता आणि ते पाहून आम्ही मुली भारावून गेलो होतो. मग, स्नेहसंमेलनात आम्ही पोवाडाच सादर करायचं ठरवलं. शाहिर बाबासाहेब देशमुख यांची कॅसेट मिळवून त्यातून वीर तानाजी मालुसरे यांच्यावरचा पोवाडा घेतला, कॅसेट ऐकूनच शिकूनच पोवाडा म्हणायला शिकलो आणि नाट्यप्रसंगांसहित हा पोवाडा आम्ही सादर केला. आमचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला, सादरीकरण सर्वांना फारच आवडलं.
1983 मध्ये मी दहावीत गेले आणि हे वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. त्यामुळं मला सावरकरांवर वेगळं काहीतरी करायचं होतं. आधी पोवाडा गायला जमला असल्यानं पोवाडा सादर करायचं ठरवलं आणि मे 1983 मध्ये नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात साने गुरुजी कथामालेत माझा पोवाड्याचा पहिला कार्यक्रम झाला. हे सादरीकरण प्रेक्षकांना एवढं आवडलं की पुढं एकमेकांच्या माहितीतून मला अनेक ठिकाणी पोवाडा गायनासाठी बोलवलं जाऊ लागलं आणि हीच माझ्या शाहिरी कारकिर्दीची सुरवात होती.
हेही वाचा – युवा दिन विशेष : ‘गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात’ । Help Welfare Trust Deepali Warule
प्रश्न : महाविद्यालयात असताना शाहिरी कला तुम्ही कशी जपली?
विनताताई : शाळेत असतानाच मला पोवाडा म्हणण्यासाठी बोलावलं जायचं. अकरावीला विज्ञान शाखा असल्यानं अभ्यास आणि कार्यक्रम दोन्ही करताना ओढाताण व्हायची. पण, कलेसाठी प्रॅक्टिकल आणि तास बुडवून मी पोवाड्याचे कार्यक्रम केले.
प्रश्न : विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केल्यावर तुमच्या पालकांनी कलेवर भर देण्यापेक्षा नोकरी करण्याविषयी सुचवलं का?
विनताताई : बी. एससी. झाल्यावर मला लगेचच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती. पण तितक्यात माझं लग्न झालं. म्हणून मी नोकरी केली नाही. लग्नानंतर मी पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर 25 वर्ष मी शालेय विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेतले. विज्ञान, गणित, इंग्रजी हे विषय शिकवायचे.
प्रश्न : पुण्यात आल्यावर संसार सांभाळत तुमची शाहिरी पुन्हा कशी बहरली?
विनताताई : पुण्यात आल्यावर कुठं बोलावणं आलं तर मी पोवाडा सादर करायला जायचे. पण, सन 19979 मध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महापालिकेनं महिला शाहिरांसाठी स्पर्धा आयोजिल्या होत्या. त्यात मी माझ्या स्नेही शोभा ठाकूर यांच्या आग्रहाने सहभागी झाले. शोभा आत्यांनी स्पर्धेसाठी मला साथीदारही मिळवून दिले होते. या स्पर्धेत आम्हाला बक्षीस मिळालं, ग्रुप जमला आणि माझी शाहिरी पुन्हा बहरु लागली. मी कार्यक्रमांना गेले की माझी आई मुलींना सांभाळायची. महाराष्ट्रात शहरांत, गावोगावी मी कार्यक्रम केले.
- सन 2011 मध्ये अचानक मला अबुधाबी-दुबई इथून कार्यक्रमासाठी निमंत्रण आलं. परदेशातील हा माझा पहिला कार्यक्रम होता. साथीदारांची व्यवस्थित तयारी करुन घेऊन आम्ही दुबईला गेलो. तिथं माझा दोन तासांचा कार्यक्रम झाला, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या कार्यक्रमाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आले होते. त्यांना माझं सादरीकरण खूप आवडलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर देशविदेशात अखंडपणे माझे कार्यक्रम सुरु आहेत. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात शाहिरी रात्र कार्यक्रमात मी एकटी महिला शाहिर निमंत्रीत होते. मुंबईमधील काला घोडा फेस्टिव्हलमध्येही माझं शाहिरीचं सादरीकरण झालंय.
सन 2017 ला मॉरिशसमध्ये, सन 2018 ला लंडनमध्ये माझा कार्यक्रम झाला. अंदमानला जाणाऱ्या सहलींच्या आयोजकांकडून मला मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केलं जातंय. तिथं सेल्युलर जेलमध्ये मी सावरकरांनी रचलेल्या गीतांचं सादरीकरण करते. पर्यटकांना माहिती देते. सन 2019 मध्ये माझा एक हजारावा प्रयोग अंदमानामध्ये झाला आहे. रामकृष्ण मठ आयोजित युवा संमेलन, सीओईपी महाविद्यालय, बीएमसीसी, मॉडर्न महाविद्यालयात माझे कार्यक्रम झाले व युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. 1983 ते आत्तापर्यंत 1070 शाहिरी कार्यक्रम मी सादर केले आहेत.
हेही वाचा – दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत
प्रश्न : तुमच्या कार्यक्रम सादरीकरणाचं स्वरुप कसं आहे? कोणकोणते पोवाडे सादर करता?
विनताताई : ‘नमन वीरतेला’ हे माझ्या शाहिरी कार्यक्रमाचं शीर्षक आहे. मी सैनिकांवर काही ओळी रचल्या आहेत. त्या सैनिकांना समर्पित करुन कार्यक्रमाची सुरूवात होते. पुढं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरती होते. सावरकरांवरचा पोवाडा, सावरकरांनी लिहिलेली गाणी व बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरचा पोवाडा, झाशीच्या राणीचा पोवाडा, तानाजी मालुसरेंचा पोवाडा, प्रियकर हिंदुस्थान या गीताचं सादरीकरण असं कार्यक्रमाचं स्वरुप असतं. याशिवाय कारगिल युद्धावर, येसू वहिनी सावरकर यांच्या जीवनावर, योगी अरविंद यांच्या जीवनावर मी पोवाडे लिहिले असून पोवाडा अभिवाचन पद्धतीनं मी ते सादर करते.
‘पंख’ या स्वयंसेवी संस्थेने मला बाल सुधारगृहात कलासत्र घेण्यासाठी बोलावलं होतं. तिथं मी बालवीर शिरीष कुमार याच्यावरचा पोवाडा मी मुलांना गायला शिकवला आणि पंधरा-वीस दिवसात मुलांनी व्यवस्थित गाऊन नाट्यरुपात सादर केला. आणखी एका स्वयंसेवी संस्थेसाठी मी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या विषयावर पोवाडा लिहिला व कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यांना म्हणायला शिकवला आणि त्यांनी तो वस्त्यांमध्ये सादर करुन प्रबोधन केलं. असं प्रसंगानुरुप पोवाड्यांच सादरीकरण मी करते. पोवाडा सादरीकरणाचं प्रशिक्षणही देते.
प्रश्न : गेली चाळीस वर्ष पोवाडे सादर केल्यानंतर आज काय भावना आहे?
विनताताई : चाळीस वर्ष पोवाडे गाऊन मला आज कृतार्थ वाटतंय. कार्यक्रम सादर करताना उत्तरोत्तर महान क्रांतीकारकाचं जीवन प्रगल्भतेनं समजत गेलं. तरुण वर्गामध्ये या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचं समाधान आहे आणि सन 15 ऑगस्ट 2018 ला लंडनच्या महाराष्ट्र मंडळामध्ये आपला राष्ट्रध्वज माझ्या हस्ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातीच्या हस्ते फडकवला गेला. हा माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहे. हा क्षण माझ्या मनावर कोरला गेलाय. यापुढेही माझं शाहिरीचं व्रत असंच सुरु राहिल.
प्रश्न : या सुंदर, प्रभावी शाहिरीसाठी कोणते सन्मान मिळाले आहेत?
विनताताई : पुणे महापालिकेने माझा गौरव केला आहे. पठ्ठे बापूराव सह पुरस्कार, आपुलकी संस्थेकडून कलागौरव मला लाभले आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी येथेही मला सन्मानित केलं आहे.
प्रश्न : शाहिरी जपण्यासाठी, तिचा दर्जा टिकवण्यासाठी, ती सर्वदूर पोचवण्यासाठी तसंच नवनवीन पोवाडे लिहिले जावेत, नवीन शाहिर घडावेत यासाठी शाहिराचं भक्कम संघटन आवश्यक वाटतं का?
विनताताई : शाहिरांची संघटना आहे, मी कोणत्याही संघटनेत नाही. संघटन असणं हे चागंलं आहे. परंतू संघटना म्हटली की राजकारण येतं, मग संघटनेचा मूळ उद्देश बाजूला राहतो, वेगळंच चित्र दिसतं. त्यामुळं संघटना ही उद्देशानुसारच कार्यरत असायला हवी.
प्रश्न : तरुणवर्ग आणि मुली-महिला शाहिरी कलेकडं वळण्याचं प्रमाण फार कमी आहे, यात कसा बदल होईल?
विनताताई : पोवाडा ही महाराष्ट्राची लोककला आहे. ती आपण जपली-जोपासली पाहिजे. त्यासाठी कलेला लोकमान्यतेबरोफरच भक्कम राजमान्यता हवी आहे. एखादा विषय मनांपर्यंत पोचवण्याचं, जागृतीचं, प्रबोधनाचं पोवाडा हे प्रभावी माध्यम आहे. पोवाडे ऐकून प्रत्येक वयोगटातले श्रोते प्रभावित होतात. त्यांच्या अंतर्मनात इतिहासाचा, क्रांतीवीरांचा, देशाचा, देशसेवेचा, कलेचा असे विविध विचार रूजले जातात आणि वेगवेगळ्या रुपात ते विचार अंकुरतात.
“शाळेपासूनच पोवाडा या लोककलेची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली पाहिजे. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम-कार्यशाळा झाल्या पाहिजेत. तरच दर्जेदार शाहीर घडतील. माझ्याकडे अनेक ज्येष्ठ महिला पोवाडा म्हणायला शिकतात व त्यांच्या समारंभात सादरही करतात. या ज्येष्ठ भगिनींकडं पाहून तरुणींनी व शाळेच्या मुलांच्या मातांनी पोवाडा गायन व लेखनाचं कौशल्य आत्मसात केलं तर अनेक महिला शाहिर घडतील.” – विनता जोशी
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील सावळा गावात 10 दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; महिलांना कृषी साहित्यांचे वाटप
– पाटील एक फोटो प्लीज..! लोणावळ्यात प्रति मनोज जरांगे पाटलांची हवा, फोटो-सेल्फीसाठी नागरिकांची झुंबड – पाहा Photo । Manoj Jarange Patil
– मावळ तालुक्यात मनोज जरांगे पाटलांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान; पगडी डोक्यावर चढवताच पाटील भावूक । Manoj Jarange Patil In Lonavala