भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. हर घर तिरंग्यातही संपूर्ण देश सहभागी झाला. मावळ तालुक्याच्या टोकाला असलेले उधेवाडी गावही यात मोठ्या आनंदाने सामील झालं होतं. आपण स्वतंत्र झालो याचा 75 वा दिवस त्यांनीही साजरा केला. पण त्यांचा हा आनंद बाहेरच्या जगात कुणाला दिसला नाही. इथे बाहेरचा जग हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक वापरत आहोत. ( Rajmachi Udhewadi Village Near Lonavla Deprived of Road Electricity And Water )
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. पण पुणे-मुंबई या शहराच्या मध्यावर असलेले आणि लोणावळा शहरापासून 30-40 किलोमीटर दूर असणारे मावळ तालुक्यातील दुर्गम उधेवाडी गाव अजूनही मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहे. कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण उधेवाडी गावातील राजमाची इथे अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ना त्या गावात जायला पक्का रस्ता आहे. अतुल सावंत यांनी ही बाब दैनिक मावळच्या निदर्शनास आणून दिली.
एकीकडे हवेतून टॅक्सी नेण्याची संकल्पना केंद्र सरकार मांडत असताना दुसरीकडे देशातील एखाद्या गावात वीज पोहोचलेली नसणे, पक्का रस्ता नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे हे उधेवाडीच्या ग्रामस्थांसाठी पारतंत्र्य नाही का?
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एखादा जिल्हा भासावा असा विस्तीर्ण पसरलेला मावळ तालुका. तब्बल 103 गावं अन 2 नगरपंचायती, 2 नगरपालिका, 1 कॅन्टोन्मेंट मावळ तालुक्यात आहेत. तालुक्यात शहर, गाव, वाडी-वस्ती अशा स्वरुपात विखुरलेली जनता आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येकापर्यंत शासकीय सेवा-सुविधा पोहोचणे हे जरा कठीण कामच म्हणावे लागेल. मात्र, 75 वर्षांत एखाद्या गावाच्या वाडीवस्तीवर वीज नसणे, ना त्या गावात पक्का रस्ता असणे, ही बाब राजकारण्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.
दैनिक मावळने जेव्हा राजमाची येथील स्थानिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राजकीय प्रतिनिधींबाबत त्यांचा संताप उघडपणे व्यक्त केला. ‘मत मागायला पार चिखल तुडवत येतात हो.. पण रस्ता काय त्यांच्याच्याने होईना.. आमच्या गावात लाईटच नाही (हे सांगताना महिलेच्या चेहऱ्यावरील व्यथा स्पष्टपणे दिसत होती)… आम्ही दिवसातून एकदातरी डोंगरावर टाक्यातून पाणी आणतो प्यायला कारण अजून पाण्याचं काम व्हायचंय… फॉरेस्ट वाल्यांची अडचण आहे साहेब, नाहीतर पाण्याच्या टाकीचं झालं असतं.. आम्ही तर शेती कवाच बंद केली.. शेती करुन काय उपयोग.. राखता राखता जीव जायची वेळ येते…’
हा सामान्यांचा आक्रोश लोकप्रतिनीधी आणि प्रशासनापर्यंत कधी पोहोचणार आणि पोहोचला तरी त्यांना जाग कधी येणार, हेच आता पहावे लागेल.
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’
– वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?