वकील दांपत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वडगाव मावळ लीगल बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासंबंधित निवेदन मंगळवारी (दि. 30) मावळ तहसीलदार यांना देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दांपत्य गुरुवारी, दिनांक 25 जानेवारी 2024 पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत कळाले. सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाल्याने देशात वकील ही सुरक्षित नाही, अशा घटना वारंवार घडत आहेत. वकील संरक्षण कायदा पारित करावा, सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी’ अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ( strict action should be taken against culprits in ahmednagar lawyer couple murder case vadgaon legal bar association letter to maval tehsildars )
वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने मावळचे निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष ॲड. सोमनाथ पवळे, ॲड. धनंजय कोद्रे, ॲड. दिपक चौधरी, ॲड. प्रिया पंडित, ॲड. मोनाली कुलकर्णी, खजिनदार ॲड. मिनाक्षी ढोरे, सचिव ॲड. प्रणोती पिंगळे, ॲड. अक्षय रौधळ आदी उपस्थित होते
वकील दांपत्याच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरले –
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील पती पत्नीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्य 25 जानेवारीला दोघेही राहुरी कोर्टात गेले. मात्र घरी परतलेच नाही. राजाराम जयवंत आढाव (52) व मनिषा राजाराम आढाव (42) हे दोघे घरी न आल्याने 26 जानेवारीला राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेतली.
पोलीस तपासात राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेली असल्याचे आढळले. या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग (रा. राहुरी) याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दांम्पत्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अधिक तपास केला असता पाच जणांनी संगनमताने खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याचे समोर आले.
मात्र खंडणीसाठी नकार दिल्याने 5 ते 6 तास त्यांचा एका घरात बांधून छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याच गाडीमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन जात रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यात प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर उंबरे गावातील स्मशानभूमीजवळील विहिरीत दगड बांधून मृतदेह पाण्यात टाकून देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा –
– अखेर पुणे-लोणावळा लोकल दुपारी धावली; मंत्री दानवे, खासदार बारणेंनी दाखवला हिरवा झेंडा । Pune Lonavala Local Train
– ‘नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे’ – रविंद्र भेगडे । Talegaon Dabhade
– गौरवास्पद! महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मावळ तालुक्यातील ‘या’ किल्ल्याचाही समावेश