Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक गावांसह परिसरातील उद्योग धंदे, व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महानगराकरिता पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारे पवना धरण आटू लागले आहे. सद्यस्थितीत (सोमवार, दि. २५ मे) पवना धरणात अवघा २७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागलेली असताना पाण्याचा वापर देखील वाढला आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे, या सर्वांचा परिणाम म्हणजे जलस्त्रोतांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. पवना धरणावर अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सोबत पिंपरी-चिंचवड सारख्या शहरासाठी पवना धरण हे प्रमुख जलस्त्रोत आहे. त्यामुळे पवनेतील पाण्याचे योग्य नियोजन होणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे.
सोमवारी (दि. २५) सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात सध्या २७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला धरणातील पाणीसाठा २५.२७ टक्के इतका होता. गतवर्षीपेक्षा यंदा दोन टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असला तरीही यंदा ‘अल निनो’चा असणारा प्रभाव लक्षात घेता हे पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.
धरण विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन हे 30 जून पर्यंत पुरेल असे करण्यात आले आहे. मात्र यावर्षी अल निनो प्रभाव असल्याने १५ ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याच्या सूचना धरण विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्रव्यवहार केला असून १५ % पाणीवापर कपात करण्याचे सांगितले असल्याचे धरण विभागाचे अभियंता रजनीश बारिया यांनी दिली.
पावसाळा लांबल्यास व उन्हाची तीव्रता वाढल्यास जलसाठ्यात घट येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन पवना धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

