Dainik Maval News : नीट ( NEET ) पेपर लीक प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेस ( आय ) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २२) यासंदर्भात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले.
यावेळी मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तळेगाव शहराध्यक्ष विशाल वाळुंज, तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे, ज्येष्ठ नेते अॅड खंडूजी तिकोणे, राजीव फलके, किरण मोकाशी, नितीन माने, सुधीर गायकवाड, युवक अध्यक्ष संदीप सातकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षेमध्ये झालेल्या कथित पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव, अन्याय आणि असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांवरन मानसिक ताण वाढला असून माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
तसेच सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. NEET ही देशातील अत्यंत महत्त्वाची आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे. लाखो विद्यार्थी अनेक वर्षे कठोर मेहनत करून या परीक्षेची तयारी करतात. अशा परीक्षेमध्ये पेपर लीकसारखे गैरप्रकार होणे हे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत घातक असून शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी करणारे असल्याचे म्हटले आहे.
सदर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात यावे.,
१. NEET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
२. संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यातन यावी.
३. भविष्यात अशा घटनान टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेमध्ये कडक सुधारणा करण्यात याव्यात.
४. प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.
५. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण लक्षात घेऊन समुपदेशन व मदत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
६. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

