लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीला मोठे अपयश आले आहे. त्यातही राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अपयश आले. या अपयशावर विचारमंथन करण्यासाठी आज (दि. 6 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांची आणि नंतर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबईतील या बैठकीला राष्ट्रवादी पक्षातील 5 आमदारांनी दांडी मारली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अगोदर वरीष्ठ नेत्यांची सभा झाल्यानंतर लगेचच राज्यातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक अजितदादांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वठिकाणच्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. परंतू या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार सुनिल आण्णा टिंगरे, आमदार आण्णा बनसोडे, आमदार नरहरी झिरवळ, आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार राजेंद्र शिंगणे हे गैरहजर राहिले होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे दिवसभर अनेक चर्चांना उधाण आले होते. अगदी त्यांच्या घरवापसीची चर्चा होते होती. परंतू अखेर स्वतः अजित दादांनी यावर पडदा टाकला आहे. ( five mla of ncp party ajit pawar group were absent from meeting after lok sabha elections result )
अजितदादांची पत्रकार परिषद –
आमदारांसोबत बैठक संपन्न झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूकीत आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. सोबतच दोन्ही बैठकांबाबत माहिती दिली. तसेच गैरहजर राहिलेल्या आमदारांबद्दलही सांगितले. पाचही आमदारांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण सांगितले आहे, तसेच संपर्क केला असल्याचे अजितदादांनी स्वतः सांगितले. तसेच होणाऱ्या सर्व चर्चा चुकीच्या असून सर्वजण सोबत आहेत. पाचही जण वैयक्तिक कारणामुळे आज गैरहजर होते, हेही दादांनी स्पष्ट केले.
का होते आमदार गैरहजर?
आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आजार असल्याने ते मुंबईत बैठकीला गेले नाही, तसे, त्यांनी कळवलं होतं. तर नरहरी झिरवळ हे रशियाला अर्थात परदेशात असल्याने गैरहजर आहेत. तर आमदार सुनील टिंगरे हेही वैयक्तिक कामानिमित्ताने बाहेर आहेत. राजेंद्र शिंगणे हे आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाही, तर अण्णा बनसोडे ह्यांनीही वैयक्तिक कामास्तव उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले. अखेर अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला.
अधिक वाचा –
– श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News
– पवना शिक्षण संकुलात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमाची सुरूवात; संस्थेमार्फत 9000 झाडांची होणार लागवड । Pavananagar
– थराराक ! मावळ तालुक्यात दोन गटात हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी । Maval Crime