Dainik Maval News : महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गौरव महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रे’चे मावळ तालुक्यात भव्य आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्राभिमान, सांस्कृतिक गौरव आणि ऐतिहासिक जाणीवेचा संगम पहायला मिळाला.
वडगाव मावळ येथे बुधवारी (दि. 30) दुपारी चार वाजता आणि त्यानंतर लोणावळा शहरात संध्याकाळी पाच वाजता रथयात्रेचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी “तोच उत्साह, तोच जयघोष, आणि आपल्या मातृभूमीच्या गौरवासाठी तोच अभिमान!” अशी भावना प्रत्येकाच्या मनात दिसून आली.
- या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, एक मे ते चार मेदरम्यान विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
गौरव रथयात्रेचा उद्देश तरुण पिढीला महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या व्यक्ती, स्थळे, घटना यांची ओळख करून देण्याचा आहे. या रथात महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे जल, धार्मिक स्थळांची माती, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांची माती एकत्रित करून त्याचे पूजन करण्यात आले आहे. ही यात्रा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार असून, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणीही पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
- यात्रे समवेत लतिफ तांबोळी, सुरेश अण्णा घुले, राजाभाऊ कोरेकर आदी नेते होते. मावळ तालुक्यातील या भव्य स्वागत सोहळ्यात आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच गणेश आप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, दीपक हुलावळे, संदीप आंद्रे, किशोर सातकर, दीपाली गराडे, पायल देवकर, पंढरीनाथ ढोरे, मयूर ढोरे, प्रवीण ढोरे, संध्या थोरात, नारायण ठाकर, काळुराम मालपोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सुकाणू समिती, तालुका व शहर कार्यकारणी, युवक, युवती, महिला आघाड्यांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
– मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
– ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा’ ; लोणावळा भेटीत रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य । Ramdas Athawale
– पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road