Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सहा मते फुटली आणि राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतानाही भाजपाचे सुभाषराव जाधव हे सभापती झाले. या निवडणुकीनंतर मावळ भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या छोबीपछाडची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता पक्षाच्या सर्व संचालकांना थेट राजीनामे सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
संख्याबळ अन् सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत भाजपा उमेदवाराने पराभव केला. या घटनेचा सर्वत्र बोलबाला झाला अन् राष्ट्रवादीवर पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. हा पराभव गांभीर्याने घेत राष्ट्रवादी काँग्रसचे मावळ तालुक्यातील शिर्षस्थ नेते, तसेच आमदार सुनील शेळके यांनी संचालकांची बैठक घेऊन संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश दिल्याचे व राजीनामे न दिल्यास पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा दिल्याची माहिती समोर आलीये, या घटनेने मावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नक्की काय घडलं?
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 व काँग्रेसचा (आय) 1 असे 13 चे स्पष्ट बहुमत असून भाजपचे अवघे 5 सदस्य आहेत. असे असताना नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाषराव जाधव यांना 11 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलावडे यांना 5 मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीची 6 मते फुटल्याने उघड झाले. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षातीलच फुटीरांमुळे पराभव पत्करावा लागला.
आमदारांचा संचालकांना इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सलग यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला स्वपक्षातीलच बंडखोरीमुळे नामुष्की पत्करावी लागल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी बाजार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व सदस्यांनी सोमवारी राजीनामे द्यावेत, असा आदेश दिला व राजीनामे न दिल्यास हकालपट्टी करण्याचा इशाराही दिला असल्याचे समजते. दरम्यान राजीनामे देण्याचे आदेश देताना सोमवार (दि. 6) रोजी सर्वांनी राजीनामे देण्याचे आदेश दिला असून सोमवार हीच अंतिम मुदत असल्याचे समजते.
रोगापेक्षा इलाज भयंकर
दरम्यान मावळ बाजार समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असले तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभापती व उपसभापती निवडीत हवे तसे लक्ष दिले नाही, ऐन निवडणूक काळात संख्याबळाच्या जोरावर गाफील राहिले, तसेच महायुती म्हणून सत्तेत असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीला हा पराभव स्वीकारावा लागला, अशी चर्चा मावळच्या राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच मे २०२३ मध्ये बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर व राजकीय घडामोडीनंतर पक्षाच्या सर्व संचालकांची मोट बांधण्यात नेते अयशस्वी ठरले, त्यामुळे यापूर्वीच्या सभापती-उपसभापती यांचे राजीनामे लांबले, परंतु आताही सभापती निवडीत पराभव झाला, परंतु याचे खापर केवळ संचालकांवर फोडणे म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी अवस्था असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब