Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक गावे, अनेक लहान मोठे उद्योग व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महानगरासाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या पवना धरणातील जलसाठ्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढू लागला असताना दुसरीकडे पवना धरणातील जलसाठा ३९ टक्क्यांवर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाढत्या उन्हामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. शनिवारी घेतलेल्या आकडेवारीनुसार धरणात ३९.५५ टक्के इतका पाणीसाठा आहे. यापुढील मे महिना देखील तीव्र उन्हाचा राहण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पवना धरण हे पिंपरी-चिंचवड सह मावळ तालुक्यातील विविध गावांकरिता पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणातून उद्योगनगरीला ( पिंपरी – चिंचवड शहर ) ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जाते. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पवना आणि इतर ठिकाणाहून होणाऱ्या पाण्यावर नागरिकांची पूर्ण मदार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कमी दाबाने, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. पवना धरणातील पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल एवढा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेपेक्षा तो अडीच टक्क्यांनी अधिक आहे. तरीही वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन हाेत असून, पाणीसाठा झपाट्याने कमी हाेत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा


