दैनिक मावळ (प्रतिनिधी) : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत वडगाव मावळ न्यायालयाने ३ जुलैपर्यंत, म्हणजेच पाच दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी (दि. २९) पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासातील काही महत्त्वाच्या बाबी अद्याप प्रलंबित असून त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी पूर्वनियोजित कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, हा कट नेमका कुठे रचला गेला, लोहगड परिसरात पूर्वी रेकी करण्यात आली होती का, तसेच या कटात अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा तपास करणे आवश्यक आहे. याशिवाय केतन अग्रवाल यांचा पासपोर्ट शोधणे, मोबाईलमधील माहिती पुनर्प्राप्त (रिकव्हर) करणे आणि आरोपींनी लपविलेली माहिती मिळविणे आवश्यक असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
यावर बचाव पक्षाने आक्षेप घेत आरोपींना अटक कायदेशीर पद्धतीने झाली आहे का, याबाबतचा अर्ज दाखल करून घेण्याची मागणी केली. पुढील तपास प्रामुख्याने तांत्रिक स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. तसेच नाट्यरूपांतरणाची मागणी कायद्यात अभूतपूर्व असल्याचे सांगत मृत्यूला थेट हत्या म्हणणे योग्य नसल्याचाही दावा बचाव पक्षाने केला.
तसेच हा गुन्हा जामीनपात्र आहे, त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद सिया गोयल यांच्या वतीने ॲड. विपुल दुष्यंत यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
