Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन १ मेपासून तो वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी तब्बल ३० मिनिटांनी कमी करणाऱ्या या सुधारित दळणवळण प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ मार्गाला आणि त्यावरील बोगद्याला इतिहासपुरुष ‘शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे दिलीप बटवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात या नामकरणाची आग्रही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, प्रवाशांना अनेकदा मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास करताना जुन्या खंडाळा घाटातून जावे लागते. या प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या भावनेने आजही शेकडो नागरिक खंडाळा घाटाच्या माथ्यावर असलेल्या शिंग्रोबाच्या मंदिरात नाणे टाकून नतमस्तक होतात आणि दर्शन घेतात. या ऐतिहासिक वारश्याची आणि श्रद्धेची दखल घेत नवीन बोगद्याला व मार्गाला शिंग्रोबा धनगरांचे नाव देणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.
या नामांतराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना धनगर समाज आणि विविध संघटनांनी म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत १८५० च्या सुमारास सह्याद्रीच्या अत्यंत कठीण अशा बोरघाट परिसरातून मुंबई ते पुणे मार्ग शोधण्यासाठी कित्येक गोरे तज्ज्ञ आले, पण त्यांना मार्ग सापडत नव्हता. अशा हताश परिस्थितीत स्थानिक दऱ्याखोऱ्यांची खडान् खडा माहिती असलेल्या शिंग्रोबा धनगर यांनी आपल्या अद्भूत स्थानिक ज्ञानाच्या जोरावर इंग्रजांना घाटातून मार्ग कसा काढायचा याचा अचूक ‘राजमार्ग’ दाखवला. पुढील काळात त्यांनी ब्रिटिशांकडे स्वातंत्र्याची मागणी केल्याने स्वाभिमानी शिंग्रोबांची इंग्रजांनी निर्घृण हत्या केली
दुसरीकडे, उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हा मिसिंग लिंक प्रकल्प राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ देणारा ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या नव्या मार्गिकेमुळे जलद वाहतूक, कमी मालवाहतूक खर्च आणि मालाची जलद हालचाल होत असल्याने पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम झाली आहे. तसेच कामगार आणि उद्योजकांची ये-जा सुलभ झाल्याने कंपन्यांच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या नामकरणाबाबत आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री काय धोरणात्मक निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
