Dainik Maval News : राज्यात सध्या सर्वदूर मुसळधार मान्सून पाऊस सुरू आहे. जून अखेरपर्यंत लांबलेला मान्सून अखेर दाखल झाला असून हळूहळू पावसाची तीव्रता वाढताना दिसत आहे. मावळ तालुक्यात देखील सर्वच भागात मान्सूनच्या सरी कोसळत असून डोंगराळ भागात पावसाचा जोर अधिक आहे. पवन मावळ विभागात देखील गेली दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात १६ टक्क्यांवर गेलेला पाणीसाठा आता पावसामुळे आणि पाण्याचा येवा सुरू झाल्याने वाढला असून रविवारी (दि.५) सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात सध्या २३.९० टक्के पाणीसाठा आहे. तसेच धरण क्षेत्रात मागील २४ तासांत ९६ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून चालू हंगामात एकूण ४४० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच धरणात पाण्याची आवक जोरदार सुरू असून २४ तासांत १२.१७ Mm3 (दशलक्ष घनमीटर) पाण्याची आवक झाली आहे.
ओढे-ओहोळ प्रवाहित-
गेली दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने पवन मावळातील बहुतांश भागातील ओढे, ओहोळ प्रवाहित झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाणी येऊ लागले आहे. तसेच धबधबे देखील प्रवाहित झाल्याने पवन मावळचे निसर्गसौंदर्य खुलताना दिसत आहे.
शेतकरी सुखावला-
लांबलेल्या मान्सूनमुळे चिंताग्रस्त झालेला बळीराजा आता सुरु असलेल्या पावसामुळे सुखावला आहे. खरीपाच्या भातरोपांना या पावसामुळे उभारी मिळाली आहे, तर ज्या भागात बाह्यपाण्याच्या आधारे भात रोपे वाढवली होती, ती भातरोपे आता लावणीसाठी तयार झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन
– केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी
