पवन मावळ विभागातील नागरिक, सामान्य शेतकरी यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या पवना धरणातील जलसाठा घटू लागला आहे. पवना धरणात आजमितीस 167.93 दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे या भागातील मावळवासियांसाठी हा सावधानतेचा इशारा आहे. नागरिकांनी आता पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांसाठी तर ही बाब भविष्याच्यादृष्टीने अत्यंत चिंतेची आहे. याचे कारण ही दोन्ही महानगरे पवना धरणातील जलाशयावर अवलंबून आहेत. त्यामुळे आजपासूनच खरं तर पिंपरी-चिंचवडकरांनी पाण्याबाबत काटकसर करणे गरजेचे आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पाण्याची काटकसर आवश्यक –
मावळ तालुक्यातील पवना धरणात सद्यस्थितीला 56.75 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा हफ्ता सुरु आहे. सध्या असलेला 56.75 टक्के पाणीसाठा बाष्पिभवन आणि अन्य कारणे गृहित धरल्यास जूनपर्यंत पुरु शकतो, असे सांगितले जात आहे. परंतू उन्हाची तीव्रता किती असणार, धरणातून होणारी गळती, पाण्याचा ‘पाठीमागच्या दाराने’ होणारा बेसुमार वापर अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे हा जलसाठा कदाचीत लवकरही संपू शकतो. त्यामुळे सर्वांनीच याबाबत सावध होत पाण्याबाबत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. ( Only 56 percent water in Pavana Dam Citizens of Pimpri Chinchwad and Maval Need To Use Water Sparingly )
पिंपरी चिंचवडकरांना सध्या दिवसाआड पाणीपुरवठा –
पुढील वर्षापर्यंत म्हणजेच 2025 पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. परंतू उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते, तेव्हा नागरिकांच्या तक्रारीही वाढतील, अशावेळी हा निर्णय कसा वास्तवात कायम राहिल, हे पाहावे लागेल. सद्यस्थिती महापालिका प्रशासनाने 25 नोव्हेंबर 2019 पासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केलाय आणि तेव्हापासूनच हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
महापालिकेला आंद्रा आणि भामा आसखेडचा पर्याय –
पिंपरी चिंचवड महापालिका आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी शहरासाठी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत 8 हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे, हेही सध्याचे एक आश्वासक चित्र आहे. मात्र भामा आसखेड आणि आंद्रा धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या अगोदरच जास्त आहे, हेही नजरेआड करून चालणार नाही. एकूणच नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाने पाण्याबाबत योग्य निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात ‘पाणीबाणी’ होऊ शकते, हे सत्य नाकारता येणार नाही.
पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा (आकडेवारी) –
धरणातील एकूण पाणीसाठा – 167.93 दलघमी अर्थात 56.75 टक्के
धरणातील उपयुक्त पाणीसाठा – 136.79 दलघमी
पवना धरणातील मृत जलसाठा – 31.14 दलघमी
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ
– डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade
– पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक