Dainik Maval News : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ पर्यंत राहील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.
खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व खरीप कांदा या १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. केंद्र शासनाच्या https://pmfby.gov.in पीक विमा पोर्टलवर शेतकरी स्वत: ऑनलाईन अर्ज भरू शकतात. किंवा ई-सेवा केंद्रास (सीएससी), बँक वा वित्तीय संस्थेची मदत घेऊ शकतात. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ई-सेवा केंद्रास ४० रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत ई-सेवा केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क अदा करु नये.
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टँक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरून सहभाग नोंदवावा लागेल. कापूस व कांदा या व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के राहील. डिजिटल क्रॉप सर्वेतील पीक व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल व तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल. योजनेत भाग घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे. बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास अशा अर्जदारास काळ्या यादीत टाकून पुढील किमान 5 वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
पुणे विभागातील पुणे, सोलापूर जिल्ह्यात एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नजिकचे कृषी कार्यालय अथवा विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा सुधारित शासन निर्णय तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही श्री. जेजूरकर यांनी कळविले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन
– मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)


