Dainik Maval News : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ वर शिरवळ (जि. सातारा) येथे मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मावळ तालुक्यातील चार युवकांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सॉन (एमएच १४ एलजे ३०३३) ही कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला (केए २७ सी ५८७८) धडकली. धडक एवढी भीषण होती की कारमधील चार युवकांचा मृत्यू झाला.
वेदांत अर्जुन वारिंगे (१९, तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (२०, कामशेत) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या चार मुलांची नावे असून अपघातात दीक्षित दयानंद पुजारी (२०, कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, बऊर, कामशेत) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मावळ तालुका हळहळला
सदर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान या भीषण अपघातामुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली असून कामशेत, तळेगाव दाभाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चार तरुणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत
