Dainik Maval News : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीतील पालखी सोहळा रविवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत परतला. देहूकरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.
पहाटे नित्यपूजा झाल्यानंतर पिंपरीगाव येथील श्री भैरवनाथ मंदिरातून पालखी सोहळा वारकरी देहूकडे मार्गस्थ झाला. पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोडमार्गे चिंचोली येथील शनी मंदिराजवळ पालखीचा विसावा झाला. यावेळी अभंग आरती करण्यात आली. दुपारी पालखी देहूच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल होताच ग्रामस्थ आणि भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी पालखी रथाच्या बैलजोडीचे औक्षण केले. तर वेशीजवळ रामचंद्र तुपे कुटुंबीयांच्या वतीने दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, देहू नगरपंचायतीचे नगरसेवक-नगरसेविका, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथातून खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. हनुमान मंदिरासमोर संतपर अभंग झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली.
संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी आरती करण्यात आली. मुख्य मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर चांदीची अब्दागिरी, गरुड टक्के आणि रेशमी छत्रासह पालखीची देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरती झाली. यावेळी तुतारी, शंख, नगारा आणि ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
भजनी मंडपात संस्थानच्या वतीने सेवेकरी, मानकरी आणि दिंडीचालकांचा नारळ-प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्यादरम्यान सेवा बजावणारे पोलीस, गृहरक्षक दल, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय पथकाचे संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
– तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द
– पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?
