लोणावळा (प्रतिनिधी) : 24 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प हे मायलेकरं या विषयावरील अभिवाचनाने गुंफण्यात आले. अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व चैत्राली अभ्यंकर यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वेगवेगळ्या कवितांचे व कथांचे अभिवाचन करत रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.
लोणावळा शहरातील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये वसंत व्याख्यानमालेला सोमवारी 20 एप्रिल पासून सुरुवात झाली. आई व मुलांमधील संवाद यावर आधारित मायलेकरं या विषयावर मान्यवरांनी पहिल्या दिवशीअभिवाचन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात श्रीमती चिन्मयी सुमीत यांनी ‘शाळा आमची मराठी’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. “मी अजूनही मराठीच्या वाटेवरची विद्यार्थिनी आहे,” असे नम्रपणे सांगत त्यांनी सतत शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले
यावेळी विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, नगरसेवक अनिल गवळी, संस्थेच्या सचिव व व्याख्यानमालेच्याविश्वस्थ अध्यक्ष राधिका भोंडे, वसंत व्याख्यानमाला समिती 2026 चे अध्यक्ष नितीन तिकोणे सचिव संजय वाड यांच्यासह समिती सदस्य व लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृती ही महान संस्कृती असल्याचे सांगत “अतिथी देवो भव” या मूल्याची आठवण करून दिली. संस्कार म्हणजे केवळ बाह्य परंपरा नसून भावना, संवेदना आणि माणुसकी जपणे हेच खरे संस्कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषा ही संवादाचे प्रभावी माध्यम असून ती माणसांना आणि मनांना जोडते, त्यामुळे कोणत्याही भाषेला विरोध न करता सर्व भाषांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी शाळेच्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “मराठीचा अभिमान केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो कृतीत उतरायला हवा.” इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळा बंद पडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले की, “इंग्रजी शिकणे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.” मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिली आठ वर्षे तणावरहित आणि आनंदी शिक्षणाची असावीत, असे सांगत मातृभाषेत शिक्षण घेतल्यास मुलांचा भावनिक, बौद्धिक व सामाजिक विकास अधिक प्रभावी होतो, असे त्यांनी उदाहरणांसह मांडले.
संस्कृती हीच आपली खरी ओळख असल्याचे सांगत जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी आपल्या मातृभाषेशी जोडलेले राहणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला. मराठी भाषा आणि शाळा टिकवण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पालक, शिक्षक आणि समाज यांनी एकत्र येऊन विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती राबवावी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन द्यावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक
