Dainik Maval News : मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख शहरं आता आणखी जवळ आली आहे. या दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर आता आणखी कमी झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण कडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक मोठा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित 13.3 किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प 1 मेपासून म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांच्या वेळ आणि इंधन बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.
या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे प्रवासाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरघाटातील तीव्र वळणे आणि चढ-उतार टाळता आल्यामुळे प्रवासाचा वेळ किमान 30 मिनिटांनी घटणार आहे. विशेष म्हणजे, या हाय-टेक मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणताही अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही.
सुरुवातीला फक्त कार आणि बसला एंट्री
वाहतुकीच्या नियोजनासाठी MSRDC ने सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी या मार्गावर केवळ कार आणि बस यांसारख्या वाहनांनाच परवानगी दिली आहे. अवजड वाहने आणि धोकादायक मालाची वाहतूक करणारे ट्रक सध्या जुन्या घाट सेक्शनचाच वापर करतील. एक्सप्रेसवेवरील एकूण रहदारीपैकी सुमारे 70 टक्के हिस्सा कार आणि बसचा असतो, तर 30 टक्के वाहतूक अवजड वाहनांची असते. या निर्णयामुळे जुन्या घाटातील वाहतुकीचा ताण 70 टक्क्यांने कमी होऊन तिथे होणारे अपघात आणि ट्रॅफिक जामची समस्या सुटण्यास मदत होईल.
या प्रकल्पामध्ये दोन मुख्य बोगद्यांचा समावेश असून त्यांची लांबी 8.9 किलोमीटर आणि 1.9 किलोमीटर इतकी आहे. यातील 8.92 किलोमीटर लांबीचा आणि 23.5 मीटर रुंदीचा बोगदा हा आशियातील सर्वात लांब रस्ते बोगद्यांपैकी एक मानला जात आहे. या विक्रमी रुंदीमुळे या प्रकल्पाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये होण्याची दाट शक्यता असून आवश्यक निरीक्षणे पूर्ण झाली आहेत. याशिवाय, टायगर व्हॅलीमध्ये 180 मीटर पेक्षा जास्त उंचीवर 650 मीटर लांबीचा दिमाखदार ‘केबल-स्टेड’ पूल उभारण्यात आला आहे. याचे काम एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Afcons Infrastructure Ltd) या कंपनीने केले आहे.
या प्रकल्पाचा वर्क ऑर्डर 2019 मध्ये देण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष कामाला 2021 मध्ये वेग आला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेली बांधकाम साहित्याची टंचाई, घाट क्षेत्रातील अतिवृष्टी आणि वेगवान वारे यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वास काही काळ विलंब झाला. मात्र, आता सुमारे 1,000 कामगारांच्या मदतीने एप्रिलअखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली जात आहेत.
प्रचंड वाहतुक कोंडीतून होणार सुटका
नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शनिवार-रविवार दरम्यान लोणावळा आणि खंडाळा घाटात होणाऱ्या प्रचंड कोंडीतून या मिसिंग लिंकमुळे सुटका होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आशियातील सर्वात प्रगत इंजिनिअरिंग प्रकल्पांपैकी एक असलेला हा मार्ग महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील एक मानाचा तुरा ठरणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा