Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण आता कोर्टातून मंत्रालयात पोहोचले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी राज्याच्या पणन मंत्रालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाजार समिती बरखास्त प्रकरणी वादाचा चेंडू न्यायालयातून थेट मंत्रालयात पोहोचला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
मावळ तालुक्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यातील संघर्ष नेहमीच ठळक राहिला आहे.
मावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ संचालक तर, भाजपाचे केवळ पाच सदस्य होते. असे असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करीत भाजपचे सुभाष जाधव सभापतीपदी विराजमान झाले. यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक चिघळला. दरम्यान बाजार समितीतील सत्ता पालटानंतर आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ संचालकांना सामूहिक राजीनामे देण्याचे निर्देश दिले होते.
तेरा संचालकांच्या राजीनाम्यानंतर गणपूर्ती होत नसल्याने बाजार समितीचे कामकाज चालू शकत नसल्याने उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेत प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती केली.
दरम्यान, या निर्णयाविरोधात भाजपच्या पाच सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पणन मंत्र्यांनी दोन आठवड्यांच्या आत सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय आता मंत्रालय स्तरावर होणार आहे.
दरम्यान, २८ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप आणि सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राज्याचे पणन मंत्री भाजपाचे असल्याने या निकालाकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा