Dainik Maval News : मावळ तालुका म्हणजे भाताचे आगार. तालुक्यातील हजारो शेतकरी पूर्वपरंपरागत भाताचे उत्पन्न घेतात. खरीप हा तर भात पिकासाठी अत्यंत महत्वाचा हंगाम. अनेक पिढ्या भात शेतीत राबत असल्याचे तालुक्यातील गावागावांत आपल्याला दिसते. मावळातील इंद्रायणी तांदूळ तर जगात प्रसिद्ध आहे. यासह भाताच्या अनेक स्थानिक जातीही तितक्याच प्रसिद्ध आहे. एकंदरीत मावळ म्हटलं की पर्यटनासोबतच सर्वांना भातशेती हेही लगेच डोळ्यांसमोर येतं.
अलीकडे मात्र मावळातील भात शेतीसमोर काही संकटे उभी राहताना दिसत आहे. यात पहिलं संकट म्हणजे उत्पादनाचे तर दुसरे आहे शेतमजूरांचे. बदलते नैसर्गिक हवामान आणि खतांमुळे जमीनींचा घसरलेला पोत यामुळे भाताचे / तांदळाचे उत्पादन कमी होताना दिसत आहे, तर कारखानदारीमुळे मोठा वर्ग नोकरीकडे वळल्याने शेतीसाठी मजूरांची कमतरता दिसून येत आहे. अशातच भातशेती जगवण्यासाठी आणि उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि सोईची एक नवीन तंत्रशुद्ध पद्धत समोर आली आहे, जीचे नाव आहे एसआरटी अर्थात सगुना राईस तंत्रज्ञान. ही पद्धत खरेतर रायगड जिल्ह्यात सुरु झाली आणि जिचे जनक आहेत चंद्रशेखर भडसावळे. परंतू मावळ तालुक्यातही ही पद्धत आता चांगलीच प्रसिद्ध आणि पसंतीची होताना दिसत आहे. ( what is SRT Know everything about new rice cultivation method Saguna Rice Technique )
‘एसआरटी’ अर्थात सगुणा भात लागवड तंत्र विकसित करण्याचे मुख्य कारण म्हणजेच भात लागवडीचा खर्च वाचवणे, श्रमाची बचत करणे आणि उत्पादन वाढवणे. मावळातील पारंपरिक भात लागवड पद्धतील नांगरणी, चिखलणी, भाताच्या रोपांचे वाफे तयार करणे आणि नंतर मजुरांना घेऊन लावणी करणे अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. यात श्रम, वेळ आणि पैसा खर्ची पडतो. तयार रोपांच्या लागवडीसाठी दहा ते बारा मजुरांची मदत घ्यावी लागते.
परंतू ‘एसआरटी’ लागवड पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पण उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते. भात कापणीनंतर इतर पिकेही घेतली जाऊ शकतात. यामुळे शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नही वाढते.
‘एसआरटी’ लागवड पद्धतीमुळे भात लागवडीचा खर्च पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी होतो. लावणी करावी लागत नसल्याने 50 टक्के श्रम कमी होता. जमिनीची धूप 20 टक्क्यांपर्यंत थांबवता येते. रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर येऊ शकतो. भात आठ ते दहा दिवस आधी तयार होतो. समान अंतरावर रोप लागवड केली असल्याने पिकांना सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो. त्यामुळे पिकांची वाढ जोमात होते. लावणी करताना रोपांना होणारी इजाही कमी होते.
मावळ तालुक्यात त्यातही पवनमावळ भागात या घडीला 100 हून अधिक हेक्टर जमिनीवर एसआरटी पद्धतीने भात लागवड होत असल्याचे दिसत आहे. ( what is SRT Know everything about new rice cultivation method Saguna Rice Technique )
” सगुणा राइस तंत्र (एस.आर.टी.) हे भात शेती संभधित उखळनी,चिखलनी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफयावर बी टोकनी करुन ऊत्तम भात पिकवन्याचे तंत्र आहे या पद्धतित वापरलेल्या गादी वाफयामुळे भात रोपांच्या मुळाशी सुयोग्य प्रमाण, तसेच पुरेसा ओलावा राहतो. साच्यामुळे दोन रोपातील नेमके व सुयोग्य अंतर व प्रति एकर रोपाची संख्या नियंत्रित करता येऊ शकते, या पद्धतीमधे मजूर कमी लागतात. नांगरणी चिखलनी व लावणी न करायला लागल्यामुळे 50 ते 60 टक्के खर्च कमी होतो वेळेची बचत होऊन आर्थिक बचत होते.” – विकास गोसावी, कृषि सहाय्यक
“पवन मावळ भागात पोषक वातावरण आणि चांगला पाऊस पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी एस.आर.टी. पद्धतीने लागवड केल्याने ह्या पद्धती मध्ये उत्पादन जास्त मिळत असल्याचे व आवणी /लावणी चे कष्ट वाचल्यामुळे 50 टक्के त्रास कमी होतो. कोळपणी करण्याची गरज नाही, रासायनिक खतांच्या गरजेचे प्रमाण निम्म्या वर येते. ह्या पद्धतीमध्ये जुन्या अगोदरच्या पिकाची मूळे वाफ्यामध्येच ठेवल्यामुळे मुळांची जाळी तयार होते आणि त्यामुळे पावसाचा ताण पडला तरी पारंपरिक पद्धतीमध्ये चिखलनी केलेल्या जमिनी प्रमाणे भेगाळत नाही. तसेच ही अगोदरची मुळे पुढील पिकाच्या सेंद्रिय कर्बाची गरज भागवितात व माती मऊ होते. ह्या नाविन्यपूर्ण पद्धतीमूळे भाताच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.” – लहू दत्तू धनवे, कृषि मित्र व प्रगतशील शेतकरी, शिळींब.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


