Dainik Maval News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीमध्ये आणावी, यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. देहू देवस्थानने आळंदीकरांचे हे निमंत्रण स्वीकारले असून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या रविवारी (दि. २०) आळंदीत माऊलींच्या भेटीला येणार आहे. तब्बल सतरा वर्षानंतर प्रथमच असे घडणार असून तुकोबारायांचा पालखी सोहळा आळंदीत मुक्काम करणार आहे.
- माऊलींची पालखी येत्या रविवारी (दि. २०) आळंदीत दाखल होणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत यावा, असे निमंत्रण देवस्थानाकडून देण्यात आले होते. याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांना दिले होते. परंपरेप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस जाणे महत्त्वाचे मानले जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आली होते.
आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. दरम्यान २८ जुलै २००८ मध्ये तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये आणण्यात आला होता. तब्ब्ल १७ वर्षानंतर पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबाराय आळंदीत येणार आहेत.
इतिहास काय सांगतो?
पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. १६८५ पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ते आळंदीत येत होते. नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घेत पुढे पंढरपुरला प्रस्थान करत होत्या. त्यानंतर ही परंपरा खंडित झाल्यावर गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यानंतर दोन्ही संतांच्या पालखीचे मार्ग बदलले.
दोन्ही पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. या दोन संतांची भेट होण्यासाठी यावर्षी सोहळा आळंदीला नेण्याची मागणी वारकऱ्यांच्या वतीने आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली होती. दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. देहू देवस्थान येथे निमंत्रण स्वीकारल्याने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा येत्या रविवारी हजारो भाविकांना अनुभवता येईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी
