Dainik Maval News : आठ दिवसांच्या रजेवर गेलेले मावळचे गटविकास अधिकारी तब्बल अडीच महिन्यांनी परत आल्याने, मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू न देण्यासाठी (दि.१४) सकाळपासूनच बीडीओ कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे लावले. ‘हे बीडीओ नकोच’ अशी ठाम भूमिका लोकप्रतिनिधींनी यावेळी घेतली.
याप्रसंगी सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पं.स. गटनेते दिलीप ढोरे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, पल्लवी दाभाडे, मनीषा मुऱ्हे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक, योगेश लोहोर, रेश्मा देवकर, शैला कालेकर, प्राची गायकवाड, आशा मोरमारे आदी उपस्थित होते.
मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान हे सुमारे अडीच महिन्यांपासून रजेवर असून, त्यांच्या जागी सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात हे प्रभारी म्हणून कारभार पाहत आहेत. दरम्यान, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे नवीन पदाधिकारी (सदस्य) निवडून आल्यावर अवघ्या दोन महिन्यांतच गटविकास अधिकारी प्रधान हे रजेवर गेले होते.
मंगळवारी (दि.१४) अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर गटविकास अधिकारी पंचायत समितीमध्ये पूर्ववत रुजू होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार, त्यांना खुर्चीवर बसू द्यायचे नाही, या उद्देशाने सकाळी ९ वाजलेपासूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी पंचायत समितीमध्ये दाखल झाले. सकाळी १०.३० वाजेपर्यंत गटविकास अधिकारी प्रधान यांची वाट पहिली, अन त्यानंतर मात्र त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
केवळ ८ दिवसांच्या रजेवर जातो म्हणून गेलेले गटविकास अधिकारी प्रधान हे तब्बल अडीच महिने रजेवर असून, प्रशासकीय कालावधीत नियमित हजर राहणारे अधिकारी, लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्यानंतर मात्र कामात टाळाटाळ करत असल्याने, हे गटविकास अधिकारी नकोच, अशी भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
